त्यांनी दीड वर्षात केले दहा राज्यांतील ७४ बालकांना आई-बाबांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST2021-02-21T04:52:14+5:302021-02-21T04:52:14+5:30
मंगल जीवने बल्लारपूर : मागील दीड वर्षापासून बल्लारशाह रेल्वेस्थानकावरील प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वर दिवसरात्र २४ तास कार्यरत चाईल्डलाईनच्या चमूने ...

त्यांनी दीड वर्षात केले दहा राज्यांतील ७४ बालकांना आई-बाबांच्या स्वाधीन
मंगल जीवने
बल्लारपूर : मागील दीड वर्षापासून बल्लारशाह रेल्वेस्थानकावरील प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वर दिवसरात्र २४ तास कार्यरत चाईल्डलाईनच्या चमूने लॉकडाऊनच्या काळात भारतातील दहा राज्यांतील संकटात सापडलेल्या ७४ बालकांना मायेचा हात देऊन त्यांच्या आई-बाबांकडे पोहचते केले.
येथील लोकसमग्रह समाजसेवा संस्थेच्या वतीने एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत चाईल्ड इंडिया फाऊंडेशनतर्फे बल्लारशाह रेल्वेस्थानकावर चाईल्डलाईन मदत केंद्र मागील दीड वर्षापासून सुरू आहे. १२ युवकांच्या चमूसह रेल्वेगाड्यांवर शून्य ते अठरा वयोगटातील भटकलेल्या बालकांसाठी २४ तास सेवा देण्याचे काम ही मंडळी करीत आहे. मुलगा रुसून घरून निघून तर आला नाही ना, आई-बाबाच्या धाकाने वा रागावण्याने घराबाहेर पडून एसटी वा रेल्वेने कुठेतरी निघून जातात. अशा मुलांवर ही मंडळी बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम करीत आहे. या बालकांना बालकल्याण समितीच्या माध्यमातून समुपदेशन करून घरी पोहचवण्याचे काम करीत आहे.
या दीड वर्षात चाईल्डलाईन मदत केंद्राने जीआरपी, रेल्वे सुरक्षा दल, वेंडर व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील २८, तेलंगणातील १३, आंध्र प्रदेशातील ३, बिहार १०, उत्तर प्रदेशातील ३, दिल्लीचा १, छत्तीसगडचे ७, मध्य प्रदेशातील ५, राजस्थानचे ३ व आसामचा १ अशा ७४ बालकांना आधार देऊन त्यांना स्वत:च्या घरी पोहचवून सामाजिक सेवेच्या माध्यमातून मानवतेचा परिचय दिला आहे. ६२ बालकांची जीआरपी पोलिसांच्या मार्फत एफआयआर नोंद करून समोरील कारवाई करण्यात आली.
३० बालकांना पत्ता न मिळाल्याने चंद्रपूर येथे बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले. १३ बालकांचे समुपदेशन करण्यात आले. आंध्र प्रदेशातील १, बिहारचे ४, दिल्लीचा १, छत्तीसगडचे २ व मध्य प्रदेशातील १ अशा ९ बालकांच्या आईबाबांचा पत्ता न लागल्यामुळे त्यांना जिल्हा बाल संरक्षण कक्षाने त्या त्या राज्यातील जिल्हा बाल कक्षाच्या सुपूर्द केले. लॉकडाऊनच्या काळात ४७ बालकांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे चाईल्डलाईनच्या वतीने त्यांना अनाज किट देण्यात आली. यातील दिव्यांग मुलीला १२ वीच्या पुस्तकांची मदत करण्यात आली.
बालकांच्या माहितीसाठी १०९८ टोल फ्री क्रमांक
अडचणीत सापडलेल्या बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी चाईल्डलाईन दिवसरात्र काम करीत आहे. कुठल्याही व्यक्तीस बेवारस वा हरवलेले मूल, एकटे असलेले आढळले तर अशा मुलांच्या मदतीसाठी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवता येेते.
- भास्कर ठाकूर, समन्वयक, चाईल्ड लाईन, बल्लारशाह रेल्वेस्थानक.