बल्लारशहा रेल्वे पीट लाईनचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST2021-03-06T04:27:15+5:302021-03-06T04:27:15+5:30
वसंत खेडेकर फोटो बल्लारपूर: प्रवास बसचा असो की रेल्वेचा अथवा विमानाचा, त्यात स्वच्छता आणि वाहनांची परिपूर्ण सुरक्षितता आवश्यक ठरते. ...

बल्लारशहा रेल्वे पीट लाईनचे काम प्रगतीपथावर
वसंत खेडेकर
फोटो
बल्लारपूर: प्रवास बसचा असो की रेल्वेचा अथवा विमानाचा, त्यात स्वच्छता आणि वाहनांची परिपूर्ण सुरक्षितता आवश्यक ठरते. रेल्वेबाबत तर या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ! एकमेकांशी जोडलेल्या २४-२५ डब्यांच्या गाडीत एकाच वेळेला सुमारे १५०० च्या वर प्रवासी असतातच. त्यामुळे, रेल्वेला गाडीच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच जागरूक राहावे लागते. रेल्वे गाड्यांच्या सुरक्षिततेची काटेकोरपणे काळजी घेण्याकरिता काहीच मोजक्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर पीट लाईनची व्यवस्था आहे.
त्या ठिकाणी रेल्वे गाड्यांची परिपूर्ण तपासणी तसेच डब्याची स्वच्छता केली जाते. गाडीची स्वच्छता आणि सुरक्षितता याची काळजी घेण्याचे पीट लाईन हे महत्त्वाचे ठिकाण ! बल्लारशहा हे मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे स्थानक. त्यामुळे या स्थानकावर पीट लाईन बसविले जात आहे. सुमारे ८ कोटी रुपये खर्च करून ५८५ मीटर लांबीच्या या पीट लाईनचे काम वेगाने सुरू असून या वर्षीच्या जून पर्यंत ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ही पीट लाईन बल्लारशहा रेल्वे स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला उभारली जात आहे.
बल्लारशहाला थेट लाईन असावी अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी सतत संपर्क साधत या मागणीचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन येथे पीट लाईन मंजूर झाली व त्याचे भूमिपूजन अहिर यांच्या हस्ते डिसेंबर २०१९ ला झाले.
बॉक्स
२५ डब्यांची होईल स्वच्छता
बल्लारशहा रेल्वे स्थानक हे एनएसजी ४ या श्रेणीत मोडते.
त्या स्थानकावर सहा डब्याची स्वच्छता करण्याची व्यवस्था पूर्वीपासून आहे. पीट लाईनमुळे एकाच वेळेला २५ डब्याची स्वच्छता व सुरक्षितता तपासणी केली जाणार आहे.
मध्य रेल्वे मुंबई समितीचे सल्लागार सदस्य अजय दुबे यांनी निर्माणाधीन पीट लाईन स्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.