अस्मिता ‘सॅनिटरी नॅपकीन’ योजना महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:28 IST2018-03-08T23:28:18+5:302018-03-08T23:28:18+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य व सन्मान याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने अस्मिता योजनेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला आहे.

अस्मिता ‘सॅनिटरी नॅपकीन’ योजना महिलांचा सन्मान
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य व सन्मान याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने अस्मिता योजनेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याबात अधिक जागरुक होण्यासाठी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अस्मिता योजना लाभदायक ठरणार असून याचा फायदा ग्रामीण भागातील शालेय किशोरवयीन मुलींना होणार आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण अस्मिता योजना असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
महिला दिनानिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्मिता सॅनिटरी नॅपकीन योजनेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिवदास, महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे आदी उपस्थित होते.
अस्मिता योजना ही बचत गटाच्या माध्यमातून घराघरात पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच त्यांचे जीवनमान व शैलीत फरक पडून त्यांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद या माध्यमातून मिळेल. प्रत्येक महिलेने कोणत्याही गोष्टीकरिता पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दारुबंदी झाली असून आता व्यसनमुक्तीसुध्दा महिलांच्याच माध्यमातून होऊ शकते. याकरिता महिलांनी गावाचे नेतृत्व करावे, असेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर म्हणाले, महिलांनी स्वत:च्या शरिराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण स्वच्छता बाळगली नाही तर अनेक रोगांना दरवर्षी महिला बळी पडतात. स्वच्छता बाळगणे हे कर्तव्य आहे. महिलांना सन्मानाने जीवन जगण्याकरिता बचत गटामार्फत सुरु असलेल्या सॅनिटरी नॅपकीन अस्मिता योजनेचा आज शुभारंभ होत असून त्याचा लाभ जिल्हयातील ५३ हजार ४५९ जिल्हा परिषद अंतर्गत शालेय किशोरवयीन मुलींना होणार आहे. अस्मिता योजनेअंतर्गत हे सॅनिटरी नॅपकीन पाच रुपयांमध्ये आठ पॅडचे एक पॅकेट मिळणार आहे. प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक सचीन देशमुख तर संचालन तालुका अभियान व्यवथापक सुचिता पाटील यांनी केले.