जात प्रमाणपत्राविना त्यांचे आयुष्य काळवंडले !

By Admin | Updated: July 26, 2015 01:22 IST2015-07-26T01:22:35+5:302015-07-26T01:22:35+5:30

मराठवाड्यातील अनेक कुटुंब रोजगारासाठी जिवती तालुक्यात आले. कालांतराने येथेच स्थायी झाले. मात्र आता मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व इतर कामासाठी त्यांना जातीचे प्रमाणपत्र हवे आहे.

Without a certificate of caste, their lives shiver! | जात प्रमाणपत्राविना त्यांचे आयुष्य काळवंडले !

जात प्रमाणपत्राविना त्यांचे आयुष्य काळवंडले !

रहिवासी पुरावे आणावे कुठून ? : तहसील कार्यालयातही अनागोंदी कारभार
संघरक्षित तावाडे जिवती
मराठवाड्यातील अनेक कुटुंब रोजगारासाठी जिवती तालुक्यात आले. कालांतराने येथेच स्थायी झाले. मात्र आता मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व इतर कामासाठी त्यांना जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. मात्र तीन पिढ्यांचा पुरावा मागितला जात असल्याने आणि तो त्यांच्याकडे नसल्याने जात प्रमाणपत्रापासून त्यांना वंचित रहावे लागत आहे. जात प्रमाणपत्राविना काहीच करता येत नसल्याने त्यांचे आयुष्यच काळवंडत चालले आहे.
विशेष म्हणजे, जिवती तालुक्यात इतरांनाही जात प्रमाणपत्र काढणे अवघड ठरु लागले आहे. ज्यांचे जात प्रमाणपत्र निघाले, त्यांना प्रचंड मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे, असे खुद्द नागरिकांकडूनच सांगितले जात आहे. जिवती तहसील कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून हा अनागोंदी कारभार सुरू असतानाही याकडे कुण्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे जात प्रमाणपत्रासाठीची नागरिकांची ससेहोलपट अद्यापही थांबलेली नाही.
२५ ते ३० वर्षांपूर्वी मराठवाड्यातून अनेक कुटुंब जिवती तालुक्यात रोजगारासाठी आले. या ठिकाणी त्यांना रोजगार मिळू लागला. कालांतराने हे कुटुंब याच ठिकाणी स्थायिक झाले. त्यांचे मराठवाड्यातील नातलग इतर राज्यात असेच स्थायिक झाले. आता या कुटुंबांची रोजगारासाठीची भटकंती थांबली असली तरी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नवीच भटकंती नशिबी आली आहे.
मुलाबाळांच्या शिक्षणाकरिता व शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता या स्थलांतरित कुटुंबांना मुलाचे जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. मात्र शासनाच्या नव्या संकेतानुसार जात प्रमाणपत्रासाठी तीन पिढ्याचा पुरावा मागितला जातो. मात्र एवढा जुना पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध होत नसल्याने त्यांना जात प्रमाणपत्र नाकारले जात आहे. जातीचे प्रमाणपत्रच नसल्याने त्यांना अनेक योजनांवर आणि लाभांवर पााणी सोडावे लागत आहे.
आपण नव्याने रुजू झाल्यामुळे गोविंद घोटवाड यांच्या प्रकरणाबाबत आपणाला माहीत नाही. मात्र आता आपण स्वत: हे प्रकरण हाताळणार आहोत. कर्मचाऱ्यांकडून जात प्रमाणपत्रासाठी पैशाची वा पार्टीची मागणी होत असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.
-के. व्हाय. कुणारपवार,
तहसीलदार, जिवती.
चार वर्षांपासून ते मारताहेत चकरा
जिवती तालुक्यातील भोलापठार येथील रहिवासी बापुराव घंटेवाड यांनी २०११ मध्ये आपला मुलगा गोविंद घंटेवाड याचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला. त्यांची जात झिंगा भोई असून त्यांनी पुरावेही सादर केले आहेत. तरीही त्यांना सदर प्रमाणपत्र दिले जात नसून ते चार वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारीत आहेत. उलट त्यांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारे सुगंधा तुकाराम घंटेवाड रा. आंध्रप्रदेश व गंगाधर तुकाराम घंटेवाड रा. आंध्रप्रदेश यांनी जात प्रमाणपत्र देण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांनी पैशे घेऊन हा प्रकार केल्याचा आरोप बापुराव घंटेवाड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
सेतू कर्मचाऱ्यांच्या रंगतात पार्ट्या
सध्या जिवती तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. कोणत्याही कामासाठी आलेल्या नागरिकांना लुबाडण्याचा सपाटाच येथे सुरू झाला आहे. जात प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज पुढे ढकलण्यासाठी सेतु कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते. काही वेळा तर संयुक्त पार्ट्या मागितल्या जातात. असे केले तरच अर्जदाराची फाईल पुढे सरकते. अन्यथा ती तिथेच धूळ खात राहते.
पहाडावरील रहिवाशांचे पुरावे मराठवाड्यात
बंजारा, मांग, हटकर, मराठा, वंजारी जातीचे अनेक कुटुंब मराठवाड्यातून पहाडावर रोजगारासाठी आले. मात्र त्यांच्या पिढ्या मराठवाड्यात असल्याने जात प्रमाणपत्र काढताना पुराव्यासाठी ते मराठवाड्यात जात आहे. मात्र तिथेही कुणी नातलग राहत नसल्याने त्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे.

Web Title: Without a certificate of caste, their lives shiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.