पुतळा उभारताना प्रशासनाने आक्षेप का घेतला नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:55+5:302021-03-07T04:24:55+5:30
चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा ...

पुतळा उभारताना प्रशासनाने आक्षेप का घेतला नाही ?
चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभारताना प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही, असा प्रश्न निवृत्त प्रशासकीय अधिकारी व ज्येष्ठ विचारवंत प्रभू राजगडकर यांनी उपस्थित केला. चंद्रपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते.
चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू राजगडकर म्हणाले, ज्याअर्थी पुतळा उभारला त्याअर्थी उभारण्याबाबतचे सोपस्कार पूर्ण केले असावेत, हे गृहीत धरावे लागेल. पुतळ्यासाठी चबुतरा आदी बांधकाम सुरू होते. पुतळाही बसवला आणि अचानक दोन दिवसांनी मनपा प्रशासनाने क्रेनने उचलून नेला. त्याची मोडतोड झाली का, तो जप्त करून कुठे ठेवला का, हेही आदिवासींना कळू दिले नाही. याबाबतची वस्तुस्थिती पुतळा समिती व माध्यमांनी जनतेसमोर मांडावी. परंतु, पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभा उभारल्यानंतरही प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही. घेतला असेल तर पुतळा समितीने त्यावर काय केले, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे, याकडेही राजगडकर यांनी लक्ष वेधले.
ही तर सामंतवादी मानसिकता
संसदेत तैलचित्र लावून भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान केला जात आहे. मात्र, या महापुरुषाचा चंद्रपुरातील पुतळा अशा अमानुष तऱ्हेने क्रेनने उचलून नेणे म्हणजे बिरसा मुंडा यांचा उपमर्दच नव्हे तर आदिवासींना आम्ही मोजत नाही, असा हा दंभ आहे. आदिवासींना कोणत्याही तऱ्हेने अपमानित केले तरी काहीच फरक पडत नाही, ही सामंतवादी मानसिकता असल्याने तरुणाईने संविधानिक चौकटीतून प्रतिकार केला पाहिजे, असेही राजगडकर यांनी चर्चेदरम्यान म्हणाले.
सन्माननीय तोडगा काढावा
ब्रिटिश राजवटीत आदिवासींवर अन्याय झाल्याने बिरसा मुंडा यांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांतही अन्याय होत असेल तर आदिवासींनी काय करायला हवे, हे कोणी सांगू शकेल? त्यामुळे यावर प्रशासन, सर्व राजकीय पक्ष, आदिवासी समाज, पुतळा समिती व सर्वांनी मिळून तातडीने सन्माननीय तोडगा काढावा, अशी अपेक्षाही राजगडकर यांनी व्यक्त केली.