कोरपना तालुक्यातील पांढरे सोने अज्ञात रोगाने नष्ट
By Admin | Updated: August 31, 2015 00:51 IST2015-08-31T00:51:18+5:302015-08-31T00:51:18+5:30
कोरपना तालुका पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी कोरपना तालुक्यातील बोरगाव, इरई, एकोडी, भारोसा, तामसी रिठ, सोनुर्ली, खैरगाव, तळोधी, विरुर, गाडेगाव या गावात ...

कोरपना तालुक्यातील पांढरे सोने अज्ञात रोगाने नष्ट
शेतकरी हवालदिल : पिकांवर झपाट्याने होत आहे रोगाचा प्रसार
ंगडचांदूर: कोरपना तालुका पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी कोरपना तालुक्यातील बोरगाव, इरई, एकोडी, भारोसा, तामसी रिठ, सोनुर्ली, खैरगाव, तळोधी, विरुर, गाडेगाव या गावात कपाशीवर अज्ञात रोगाने आक्रमण करुन संपूर्ण पीक नष्ट केले आहे. तालुक्यातील जवळपास ६०० एकर क्षेत्रावरील कापूस पीक नष्ट झाले असून या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने कापसाचे उभे पीक या रोगाला बळी पडत आहे.
शेतकऱ्यांच्या होत असलेल्या प्रचंड नुकसानाची नोंद प्रशासनाने आत्तापर्यंत नोंद घेतली नाही. गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व्यथा सांगितली. तातडीने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. आ. संजय धोटे, माजी आमदार वामनराव चटप यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित सर्वे करण्याची विनंती केली. मात्र आठ दिवस लोटले तरी सर्वेक्षण सुरु झालेच नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतातील उभे पीक डोळ्यासमोर वाळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, माजी अध्यक्ष प्रा. विजय आकनुरवार यांनी बोरगाव येथे रविवारी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून पिकाची पाहणी केली. या अज्ञात रोगाचा सर्वाधिक फटका बोरगावला बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जगन्नाथ गारघाटे यांचे १२ एकर, रामदास गोहोकार ११ एकर, जनार्धन नवले १० एकर, लहूजी खुजे यांचे तीन एकर, महादेव खुजे यांचे सहा एकर, सुभाष खुजे यांच्या पाच एकर क्षेत्रावरील कापूस पीक नष्ट झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी वाळलेली कापसाची झाडे काढून वखरणी केली आहे. तर काही शेतकऱ्यांना सर्वेक्षणाची प्रतीक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तूर, चणा, जवस बियाणे उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी, सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष
कृषी विभागाचा सल्ला ठरला निष्फळ
ंकृषी सहायक यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची पाहणी करुन या अज्ञात रोगाच्या नियंत्रणासाठी युरिया व बावीस्टीनची फवारणी करण्याचा सल्ला दिला, तेव्हा अरुण नवले यांनी त्वरित सांगितलेले औषध त्यांचेसमोरच पिकाला दिले. मात्र तरीसुद्धा कापूस पीक वाळले व नुकसान झाले. कृषी विभागाचा सल्ला निष्फळ ठरल्याचे शेतकरी सांगत आहे. यवतमाळ येथील कृषी तज्ज्ञ डॉ. सी. व्ही. पाटील यांनी बोरगावला भेट देऊन रोगग्रस्त कपाशीची पाहणी केली. मातीचे नमुने तसेच रोगग्रस्त झाडे घेऊन गेले. तपासणी अहवाल अद्यापपावेतो कळला नाही. चंद्रपूर येथील आत्माच्या कृषी तज्ज्ञ डॉ. मानकर यांनीसुद्धा भेट दिली व पाहणी केली. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे त्वरीत सर्वेक्षण करुन नुकसानभरपाई द्यावी व तूर, चणा, जवसाचे बियाणे उपलब्ध करुन दिल्यास ते तरी पीक घेता येईल अन्यथा पेरणीची वेळ गेल्यावर काहीच फायदा होणार नाही. नैसर्गिक आपत्ती समजून प्रशासनाने दखल घेऊन तातडीने सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी भारोसाचे उपसरपंच अजय बोबडे, एकनाथ गोखरे, देवराव पावडे, अरुण बोबडे, रमेश आगरे, रवींद्र आत्राम, विनोद भगत यांच्यासह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी केली आहे.