आठवडी बाजाराची मागणी
By Admin | Updated: May 8, 2016 00:47 IST2016-05-08T00:47:12+5:302016-05-08T00:47:12+5:30
नागभीड ते देलनवाडी रस्त्याने नागभीड शहर विस्तारले जात आहे. या भागात अनेक नवीन वसाहती निर्माण होत असून हळूहळू विकसित होत आहे.

आठवडी बाजाराची मागणी
दोन कि.मी. अंतराची पायपीट थांबेल
ब्रह्मपुरी : नागभीड ते देलनवाडी रस्त्याने नागभीड शहर विस्तारले जात आहे. या भागात अनेक नवीन वसाहती निर्माण होत असून हळूहळू विकसित होत आहे. मात्र भाजीपाला, किराणा, कापड व अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिकांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर जावे लागते. नगरपालिका प्रशासनाने शुक्रवार वगळता एक दिवस येथे आठवडी बाजार भरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पूर्वी ब्रह्मपुरीकडे भवानी देवस्थानाजवळ मंगळवारी भरणारी गुजरी प्रसिद्ध होती. कालांतराने ती बंद झाली. परंतु शुक्रवार बाजार तेथील नागरिकांना जवळ असल्याने गुजरीची उणीव भासली नाही. परंतु सध्या देलनवाडी वॉर्डात देलनवाडी, श्रीनगर, शेषनगर, आनंदनगर, पटवारी कॉलनी, शांतीनगर, विद्युत कॉलनी, गुरुदेव नगर, शिक्षक कॉलनी अशा वसाहती झाल्या आहेत. या परिसरात बहुतांश कुटुंब प्रमुख आजुबाजूला ५० ते १०० कि.मी.चा प्रवास नोकरीनिमित्ताने करीत असतात. काही कुटुंबप्रमुख शनिवार व रविवालाच कुटुंबासोबत राहत असतात. अशा बहुतांश कुटुंबामध्ये महिला वर्ग व लहान मुले वास्तव्यास राहत असताना मुख्य बाजारात किंवा आठवडी बाजारात जाण्यासाठी एक ते दोन कि.मी. प्रवास करुन जावे लागत असते. यासाठी महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असते. अनेकदा बाजारात जाताना रिक्षा मिळत नसल्याचाही अनुभव आल्याने मुख्य बाजार व बाजारपेठ सहज व सोपे राहिले नाही. नागभीड रोडवर वेगाने धावणारी वाहने यामुळेही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आठवड्यातून शुक्रवार वगळून कोणत्याही दिवशी गुजरी भरविण्याची मागणी केली जात आहे.
राखीव जागेत भरवा बाजार
नगरपालिकेने या नवीन लेआऊटमध्ये अनेक क्षेत्र राखीव ठेवले आहे. त्यापैकी रस्त्यालगत आनंदनगराला लागून असलेले राखीव क्षेत्र बाजारासाठी ठेवले आहे. त्याठिकाणी गुजरी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
वेगावर नियंत्रण आणा
ख्रिस्तानंद चौक ते देलनवाडीपर्यंत वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवण्याचे कडक धोरण अवलंबविण्याची मागणी अनेक महिलावर्गाकडून केली जात आहे. पोलीस प्रशासनाने भरधाव वेगाने चालविण्याऱ्या दुचाकी व चारचाकीधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.