वऱ्हाडी नसलेला असाही एक लग्नसोहळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:48+5:30
लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर विरजण पडले एका मंदिरात फक्त वधूचे आईवडील मामा व वराचे आईवडील आणि मामा यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला.
अमोद गौरकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : ना सनई-चौघडे...ना बॅन्ड बाजा पथक..ना भटजी...ना वऱ्हाडी..ना जेवनावडी.. नाही मानपान.. नाही कोणताच थाटमाट. अगदी साध्या पद्धतीने विवाह करून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न दोन कुटुंबीयांनी करीत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाने देशभरातच थैमान घातले आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना एकत्रित जमा होऊ नका, एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, शक्य होत असेल तर लग्न कार्य पुढे ढकला, असे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसादही मिळत आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी शंकरपूर येथील हिंगे परिवार पुढे आला. शंकर हिंगे यांच्या मुलगा आकाश याचे लग्न डिसेंबर महिन्यात जुळले. तेव्हाच साक्षगंध आटोपून १९ मार्च तारीखही काढली. लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासूनच कोरोना या विषाणूजन्य रोगाने महाराष्ट्रात पाय पसरलाय सुरुवात केली. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून जनतेला आवाहन केल.े त्यामुळे लग्न करायचे की नाही, की पुढे ढकलायचे असा गंभीर प्रश्न हिंगे परिवाराला पडला. अखेर त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फक्त वर-वधु आणि आईवडील एवढेच जण एकत्र येत लग्न सोहळा उरकविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वधू पक्षांकडील हिरुडकर परिवाराला कळविण्यात आला.
त्यांनीसुद्धा या निर्णयाला समर्थन दिले आणि एका मंदिरात फक्त वधूचे आईवडील मामा व वराचे आईवडील आणि मामा यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला. शनिवारी होणारे स्वागत समारंभही रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे लग्न समारंभाच्या आनंदावर विरजण जरी पडले असेल तरीपण लोकांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे जनमाणसात स्वागत केले जात आहे.