जीवतीत पार पडली पाणी टंचाईची आढावा बैठक
By Admin | Updated: May 18, 2016 00:55 IST2016-05-18T00:55:58+5:302016-05-18T00:55:58+5:30
येथील पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. माणिकगड पहाडावरील

जीवतीत पार पडली पाणी टंचाईची आढावा बैठक
अधिकाऱ्यांना धारेवर धरले : नागरिकांनी मांडल्या समस्या
जिवती : येथील पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. माणिकगड पहाडावरील पाणीटंचाईचा सामना येथील सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. नागरिकांनी आढावा बैठकीत संवर्ग विकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अॅड. संजय धोटे, तहसीलदार एस.वाय. कुणारपवार, संवर्ग विकास अधिकारी नंदागवळी, पंचायत समिती उपसभापती गोतावळे, एस.डी. प्रभारी अडकिणे, विद्युत मंडळाचे वैरागडे, पाणी पुरवठा विभागाचे उद्धरवार, बांधकाम विभागाचे बर्डेकर, सिंचाईचे महाजनवार, आरोग्य अधिकारी डॉ. कोरडे उपस्थित होते तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर होते.
तालुक्याची आढावा बैठक ही वर्षातून एकदा होत असते. संपूर्ण तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांना पत्र देऊन बोलाविले नसल्याने तसेच बऱ्याच लोकप्रतिनिधींना आढावा बैठकीची माहितीही नसल्याने गावकऱ्यांत प्रशासनाबाबत नाराजी असल्याचे सरपंचांनी सांगितले. ग्रामसेवक हे गावात राहत नसून, गडचांदूर, राजुरा, चंद्रपूर येथून ये-जा करीत असल्याने गावकऱ्यांनी कामे होत नाहीत. सात दिवसांतून एकदा ग्रामसेवक गावात येत असल्याचे कैफियत अनेक नागरिकांनी आमदारांसमोर मांडली. आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगितले. साडेबारा गावातील घरकुलधारकांना संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली वेठीस धरले असल्याचे उपसभापती गोवातळे यांनी आमदार धोटेंच्या निदर्शनास आणून दिले. पूर्वीचा आंध्रप्रदेश आजच्या तेलंगणा राज्यातून साडेबारा गावातील बऱ्याच लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याचे कारण पुढे करुन महाराष्ट्रातून मंजूर झालेली घरकुलांची देयके मिळाली नसल्याच्या लाभार्थ्यांनी आमदारांच्यासमोर व्यथा मांडल्या. अॅड. धोटे यांनी ते राज्य त्यांचा पुरावा तयार करीत असल्याने आपल्या कोणत्याच योजना बंद करायच्या नाहीत. त्यासंदर्भात नंदागवळी यांना घरकुलाचे थांबलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पल्लेझरी, माथाडी, सारंगापूर येथील स्वस्त धान्य, दुकानदार योग्य दरात धान्य देत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार तहसीलदारांना तात्काळ चौकशी करुन सामान्य नागरिकांना योग्य दरात पूर्ण माल मिळाला पाहिजे, अशा सूचना केल्या. प्रास्ताविक तहसीलदारांनी केले तर आभार कुळसंगे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)