उद्याचा समृद्ध भारत बाल साहित्यिकांच्या डोळ्यात

By Admin | Updated: January 23, 2017 00:36 IST2017-01-23T00:36:34+5:302017-01-23T00:36:34+5:30

बालकांनी रचलेल्या साहित्यात पर्यावरणाचे महत्त्व, वनांचे संवर्धन, नद्यांचे शुद्धीकरण, वन्यप्राण्यांचे संवर्धन असे विषय येत आहेत.

Tomorrow's rich India, in the eyes of child writers | उद्याचा समृद्ध भारत बाल साहित्यिकांच्या डोळ्यात

उद्याचा समृद्ध भारत बाल साहित्यिकांच्या डोळ्यात

शंकर विटणकर : चंद्रपुरात एक दिवसीय बाल साहित्य संमेलन
चंद्रपूर (मिलिंद बोरकर स्मृती परिसर) : बालकांनी रचलेल्या साहित्यात पर्यावरणाचे महत्त्व, वनांचे संवर्धन, नद्यांचे शुद्धीकरण, वन्यप्राण्यांचे संवर्धन असे विषय येत आहेत. नदीमाय, झाडे लावा, ससोबा, हरीण आदी विषयांच्या कविता वाचून थक्क झालो आहे. उद्याचा समृद्ध भारत पाहायचा असेल तर तो या बाल साहित्यिकांच्या डोळ्यात पहा. त्यांना नीट समजून घ्या. त्यांची मने समृद्ध करा. भारत आपोआप समृद्ध होईल, असे प्रतिपादन नागपूर येथील बाल साहित्यिक शंकर विटणकर यांनी केले.
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या वतीने एक दिवसीय बाल साहित्य संमेलन-२०१७ स्थानिक मातोश्री विद्यालयात आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षास्थानी शंकर विटणकर होते. संमेलनाचे उद्घाटन हिंदीच्या बाल साहित्यिक डॉ. सरताज बानो काजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, विशेष अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, सामाजिक कार्यकर्ते संजय वैद्य आदी उपस्थित होते.
विटणकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाल साहित्य संमेलने होऊ लागली आहेत. ही चांगली बाब आहे. टी.व्ही.वरही बाल साहित्याचे कार्यक्रम होत आहेत. अलीकडे शालेय पाठ्यपुस्तकात बालकांच्या कविता येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सोनाली कुपरे या बालिकेची कविता बालभारतीने सहावीच्याच पाठ्यक्रमात घेतली आहे. बालकांमध्ये साहित्यासह विज्ञानादी निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करण्याची प्रचंड उर्जा निर्माण होत आहे. साहित्य निर्मिती थोडी नाजूक व भावनिक बाब आहे. नाजूक धाग्यांनी मजबूत वस्त्र विणण्याचे हे कार्य आहे. कोवळ्या मनावर सुसंस्कार करणाऱ्या नितीमत्तेच्या गोष्टी मायाळू शब्दात सांगायच्या असतात. ती सर्व आव्हाने आजची बालके समर्थपणे पेलत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विटणकर यांनी आपली एक हिंदी बालकविता सादर केली. उद्घाटक डॉ. सरताज बानो काजी यांनी बाल साहित्यिकांचे कौतुक करून त्यांच्यातील उर्जा डोळे दीपवणारी असल्याचे सांगितले.
संमेलचाची भूमिका सूर्यांशचे अध्यक्ष इर्फान शेख यांनी मांडली. संचालन सीमा पाटील-भसारकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Tomorrow's rich India, in the eyes of child writers