चंद्रपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये चार महिन्यांपासून वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:59 IST2020-06-08T15:57:22+5:302020-06-08T15:59:36+5:30
चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये चार महिन्यांपासून वाघाची दहशत
प्रकाश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे. या वाघिणीने आतापर्यत पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मासळ परिसरातील सातही गावातील नागरिक शेती कशी करायची या विवंचनेत आहेत. त्यांचा वनविभागप्रति रोषही वाढला आहे.
सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात व संपूर्ण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. याला आता हळूहळू तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता लॉकडाऊनमधे थोडीफार शिथिलता दिल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आपले जनजीवन रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
चिमूर तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आता मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात लागला आहे. त्यात चिमूरपासून १५ किमी अंतरावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाजवळील मासळ बु, कोलारा, सातारा, बामनगाव, मदनापूर, देवळी, करबडा या गावातील शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. मात्र अश्यातच जंगली प्राणी हल्ला करतात.
यामध्ये शेतकऱ्यांचा नाहक बळी जात आहे. मागील पाच महिन्यात मासळ, कोलारा, सातारा, बामनगाव या गावातील पाच लोकांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. त्यामुळे आता या गावातील नागरिकांत भीती पसरली असून आता शेतीचे कामे कशी करायची, ही चिंता आहे. वनविभागाने याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत
शेतीचे काम करताना वाघाच्या हल्ल्यात कोलारा येथील राजेश दडमल यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाने तत्काळ पाच लाख रुपयांची मदत दिली. उर्वरित रक्कम मृतकाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर देण्यात येईल, असे आश्वासन वन विभागाने दिले. यावेळी डिएफओ गुरू प्रसाद, एसीएफ जाधव, डिसीएफ लडकत, एसीफ खोरे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर उपस्थित होते.