वाघिणीच्या शिकारप्रकरणी वनमजुरासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:16 IST2019-04-17T14:14:12+5:302019-04-17T14:16:02+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार करणाऱ्या तीन शिकाऱ्यांना हुडकून काढण्यात व्याघ्र व्यवस्थापनला अखेर यश आले आहे.

वाघिणीच्या शिकारप्रकरणी वनमजुरासह तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार करणाऱ्या तीन शिकाऱ्यांना हुडकून काढण्यात व्याघ्र व्यवस्थापनला अखेर यश आले आहे. या प्रकरणात तीनही आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये खातोडा येथील वनमजुराचाही समावेश आहे. तिघांचीही न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत वन कोठडीत रवानगी केली आहे.
ताडोबाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात वाघाची शिकार झाल्याने व्याघ्र व्यवस्थापन हादरून गेले होते. शिकाऱ्यांना हुडकून काढण्याचे कडवे आव्हान व्यवस्थापनापुढे उभे ठाकले होते. १३ एप्रिलपासून शोध मोहीम सुरू असताना सोमवारी एका शिकाऱ्यांचा सुगावा लागला. तो खातोडा तपासणी नाक्यावर काम करणारा वनमजुरच निघाला. अमोल आत्राम (२३) रा. खुटवंडा असे त्याचे नाव आहे. त्याची कसून चौकशी केली असता तो शिकाऱ्यांचा खबरी असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने सुरेश कन्नाके उर्फ कुमरे (२९) रा. पळसगाव (शिंंगरू) तसेच रमेश मसराम (४१) रा. पळसगाव (शिंंगरू) या दोन मुख्य शिकारदारांची नावे उघड केली.
सदर तीनही आरोपींना व्याघ्र व्यवस्थापनाने अटक करून वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार वन्यजीवांची अवैध शिकार करणे, वन्यजीवांच्या अधिवासाला धोका पोहचविणे, जंगलात विना परवाना शस्त्रासह प्रवेश करणे आदी कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना भद्रावतीच्या न्यायालयात हजर करण्यात आले.