ते जगत आहेत उघड्यावरचे जीवन
By Admin | Updated: August 19, 2015 01:19 IST2015-08-19T01:19:53+5:302015-08-19T01:19:53+5:30
गरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली.

ते जगत आहेत उघड्यावरचे जीवन
१९८४ मध्ये मिळालेले घरकूल झाले नामशेष : देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष
घनश्याम नवघडे नागभीड
गरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली. पण त्यानंतर शासन आपले कर्तव्य विसरले. डागडूजीअभावी ही संपूर्ण घरे नामशेष झालीत आणि या आदिवासींच्या नशिबी उकिरड्यावरचे जीणे वाट्याला आले.
चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे हे गावे नागभीड नागपूर राज्यमहामार्गावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजाराच्या आसपास असून आदिवासींची लोकसंख्या एक हजाराच्या दरम्यान आहे. या आदिवासीसाठी १९८४ मध्ये इंदिरा आवास योजनेतून घरकुल योजना राबविण्यात आली. जवळपास ६२ घरकुल या आदिवासींना देण्यात आले. तत्कालिन खासदार विलास मुत्तेमवार आणि आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या हस्ते या घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. १० ते १५ वर्षे या घरकुलांची स्थिती बरी होती. पण नंतर या घरकुल योजनेला घरघर लागणे सुरु झाले. ही घरे पडायला सुरुवात झाली. घरे पडू लागल्याने या लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेकडे घरांच्या डागडुजीसाठी अर्ज केलेत. पण कोणतीही मदत त्यांना देण्यात आली नाही. या योजनेत डागडुजीटे प्रावधानच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आता ही घरे पूर्णत: नामशेष झाली असून हे सर्व लाभार्थी घरांच्या अंगणातच पाल टाकून आपले जीवन कंठत आहेत.
शासनाकडून एकदा या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असल्याने नवीन घरकुल योजनेसाठी ते आता कायमचे अपात्र झाले आहेत. अनेकदा या लाभार्थ्यांनी नवीन घरकुलासाठी अर्ज केले. पण त्यांना लाभ मिळाला असल्याचे सांगून लाभ नाकारण्यात आला. सदर प्रतिनिधीने या वस्तीला भेट दिली असता, ही वस्ती विविध समस्यांचे माहेरघर बनली असल्याचे निदर्शनास आले.या लोकांना शेती नसल्याने ते नेहमीच फिरस्तीचे व्यवसाय करतात. देवी देवतांचे फोटो विकणे, खारका मनुकांची गावोगावात फिरुन विक्री करणे हा या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
आपल्या व्यथा कथन करताना या लोकांनी सांगितले की, हिवाळा आणि उन्हाळ्यात आम्ही कसेही दिवस काढतो. पण पावसाळ्यात मात्र आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. थोडासा जरी पाऊस आला तरी झोपड्यांमध्ये पाणी घुसत असल्याने अन्न धान्य व कपडे भिजून जात असतात. शिवाय साप विचवांची भिती वेगळीच असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या व्यवसायातून आमचे पोटच भरत नाही. मग घराच्या दुरूस्तीसाठी पैसे आणायचे कुठून, असा या नागरिकांचा सवाल आहे. नवीन घर बांधण्याची आमच्यात शक्ती नाही. शासनाने आमची चौकशी जरुर करावी आणि आम्हाला घरकुलाचा लाभ पुन्हा एकदा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
ग्रामपंचायतीनेही आदिवासीच्या वस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या वस्तीत रस्त्याची व्यवस्था सुस्थितीत असली तरी नाल्या मात्र तयार करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरच जिरत असते किंवा वाहत असते. या वस्तीतच अंगणवाडी आहे. एक स्वच्छतागृह बांधण्यात आले असले तरी ते सुद्धा मोडकळीस आले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुले उघड्यावरच विधी उरकत असतात.