लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना हे एक जागतिक संकट आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना करत आहे. महाराष्ट्रात तर हे एक युद्ध असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा जास्त झाली आहे. मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. असे असताना तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करीत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. डॉक्टर हे या लढाईत महत्त्वपूर्ण घटक मानला जात आहे. हे दोघेही जिल्ह्याची प्रमुख पदं सांभाळत असले तरी त्यांचे शिक्षण त्यांना या लढाईत मोलाची साथ देत आहे. कारण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे दोघेही डॉक्टर आहेत.चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. लगतची छत्तीसगड- तेलंगणा ही राज्ये या जिल्ह्याशी जोडली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांचे केंद्र असलेल्या चंद्रपूरला कोरोनाचा धोका अधिक असणे स्वाभाविक आहे. मात्र आजपर्यंत या जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संकट नियंत्रणाची जबाबदारी असलेले दोन अधिकारी स्वत: डॉक्टर आहेत. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. कोविड-१९ हा आजार असून त्यामुळेच ही लढाई पूर्णपणे डॉक्टरांशी निगडित आहे. या दोघांच्या नियोजनाने चंद्रपूर जिल्ह्यात आजवर एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. या रोगाची लागण होऊ शकणाऱ्या सर्व बाबींची नियोजनपूर्वक आखणी करून या अधिकाऱ्यांनी चंद्रपूरकरांना मोठा दिलासा दिला आहे.खेमणार यांनी डॉक्टर म्हणून दिली आहे सेवाजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी २००८ मध्ये मुंबईतील केईएम जीएस मेडिकल कॉलेजमधून आपले एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी केईएममध्येच डॉक्टर म्हणून सेवा दिली आहे. पुढे दिल्ली येथेही खासगी डॉक्टर म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. या आजाराला न पसरण्यासाठी नियोजन करताना व डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा यांच्या संवाद साधताना खेमणार यांनी त्यांचा डॉक्टरकीचा अनुभव कामाला येत आहे.रेड्डी यांचे आंध्र प्रदेशात शिक्षण पूर्णजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील कुर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व डॉ. महेश्वर रेड्डी हे हे दोघेही केंद्रीय सेवा परीक्षेत बॅचमेट होते. परीक्षा दिल्यानंतर एकजण आएएस तर दुसरा आयपीएस झाला.शासनाचे निर्देश समजून घेताना फायदाया दोघांच्याही डॉक्टरी पार्श्वभूमीची कोरोना निवारणात मोठी मदत होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जाणारे निर्देश या दोघांना आपल्या डॉक्टर ज्ञानाने समजून घेणे सोपे जात आहे. जिल्ह्यातील यंत्रणा अहोरात्र कोरोना निर्मूलनासाठी झटत आहेत. त्याला डॉक्टरी ज्ञानाची साथ मिळत असल्याने हे सहज साध्य होत आहे.माझे वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर मुंबई आणि दिल्ली येथे डॉक्टर म्हणून सेवा दिली आहे. कोरोनाशी संघर्ष करीत नियोजन करताना व आरोग्य यंत्रणेशी संवाद साधताना, त्यांचे ऐकून घेत शासनाचे त्यांना निर्देश देताना निश्चितच डॉक्टरकीचा फायदा होत आहे.- डॉ. कुणाल खेमनार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.आंध्र प्रदेशातील कर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र प्रशासकीय सेवेत आवड असल्याने पुढे आयपीएसकडे वळलो. सध्या कोरोना व्हायरसशी आपले यद्ध सुरू आहे. अशावेळी वैद्यकीय शिक्षणाचा निश्चितच फायदा होत आहे.- डॉ. महेश्वर रेड्डी,जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या डॉक्टरकीचा असाही लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST
चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करीत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. डॉक्टर हे या लढाईत महत्त्वपूर्ण घटक मानला जात आहे. हे दोघेही जिल्ह्याची प्रमुख पदं सांभाळत असले तरी त्यांचे शिक्षण त्यांना या लढाईत मोलाची साथ देत आहे. कारण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे दोघेही डॉक्टर आहेत.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या डॉक्टरकीचा असाही लाभ
ठळक मुद्देकोरोना संसर्गावर यशस्वी नियोजन : जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही