शिक्षकांच्या निवड वेतन श्रेणीसाठी डाहुले गुरूजींचा उपोषणाचा इशारा
By Admin | Updated: September 3, 2015 00:39 IST2015-09-03T00:39:44+5:302015-09-03T00:39:44+5:30
निवड वेतन श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या ज्येष्ठ शिक्षकांना अद्यापही त्यांच्या हक्काची रक्कम न मिळाल्याने आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याद्याही ....

शिक्षकांच्या निवड वेतन श्रेणीसाठी डाहुले गुरूजींचा उपोषणाचा इशारा
जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ : ५०० शिक्षक प्रतीक्षेत
चंद्रपूर : निवड वेतन श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या ज्येष्ठ शिक्षकांना अद्यापही त्यांच्या हक्काची रक्कम न मिळाल्याने आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याद्याही न तयार केल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार रमेश डाहुले गुरूजी यांनी शिक्षक दिनापासून बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या शिक्षकांची २४ वर्षांची सेवा पूर्ण झाली त्यांना निवड वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी अन्य जिल्ह्यात झाली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही. ज्या शिक्षकांना याचा लाभ मिळावयाचा होता, त्यातील अनेक शिक्षक लाभाची प्रतीक्षा करतच देवघरी गेले. अनेक शिक्षक वार्धक्याला टेकले आहेत. जिल्ह्यात सुमारे ५०० शिक्षकांना निवड वेतन श्रेणीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. यादी तयार करताना अनेक पात्र शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अपात्र ठरवून अन्याय केल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. या अपात्र शिक्षकांना पात्र यादीत समावेश करण्याची आणि निवड वेतन श्रेणीची रक्कम तत्काळ देण्याची मागणी रमेश डाहुले यांनी केली आहे.
या मागणीसाठी त्यांचा शिक्षण विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहारही सुरू आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांना २ सप्टेंबरला जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून बोलाविण्यात आले होते. मात्र वेळ देवूनही अधिकारी चर्चेला उपस्थित राहीले नाहीत. त्याऐवजी चर्चेसाठी त्यांनी आपला प्रतिनिधी पाठविला. हा प्रकार निवृत्त शिक्षकांच्या भावनांचा अनादर करणारा असल्याची खंत डाहुले गुरूजी यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र दिनापासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यावेळी तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंनी मध्यस्ती करून लवकरात लवकर याद्या तयार करून वेतनाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार महिने लोटूनही कसलाही प्रतिसाद नसल्याने आणि याद्याही तयार झाल्या नसल्याने डाहुले गुरूजी यांनी ५ सप्टेंबरपासून जि. प. समोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)