कर विभागाचे काम कंत्राटदाराकडे
By Admin | Updated: September 11, 2014 23:23 IST2014-09-11T23:23:55+5:302014-09-11T23:23:55+5:30
चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर या इमारती निवासीच आहे.

कर विभागाचे काम कंत्राटदाराकडे
५० कोटींचे उद्दिष्ट : कंत्राटदार करणार मालमत्तेचे मूल्यांकन
चंद्रपूर : चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर या इमारती निवासीच आहे. कर विभागाने या संपत्तीचे कधी फेरमुल्यांकनच केले नाही. त्यामुळे अनेकांना सहज कर चुकविता आला. मात्र मनपाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. यावर तोडगा काढण्यासाठी मनपाने आता शहरातील मालमत्तेचे पुनर्सवेक्षण करण्याचे पुण्यातील एका कंपनीला कंत्राटच देऊन टाकले आहे.
अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरात अनेक बदल घडून आले आहेत. औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. याशिवाय शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सहाजिकच व्यापारीकरणही वाढले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी आपल्या निवासी इमारतींमध्ये फेरबदल करीत येथे व्यापारी प्रतिष्ठाने काढली आहे. इमारतींमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने असली की या इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतरण होते. अशा इमारतींचा महानगरपालिकेकडे जो रेकॉर्ड असतो, त्यातही बदल केला जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार गृहकर आकारला जातो. सहाजिकच निवासी इमारतींपेक्षा व्यावसायिक इमारतींसाठी जास्त कर आकारला जातो. मात्र हा कर वाचविण्यासाठी नागरिकांकडून मनपा कर्मचाऱ्यांची मनधरणी केली जात आहे. यातून पुढे अर्थकारणही होत असल्याचे शंका आहे. याचाच परिणाम म्हणून मनपाच्या रेकॉर्डवर शहरातील अनेक अशा इमारती व्यावसायिक इमारतीत रुपांतरित होऊ शकल्या नाही. त्यामुळे अशा इमारतीचे मालक निवासी इमारतींचाच कर भरीत होते. या कर चुकवेगिरीमुळे मनपाला कोट्यवधींचा फटका बसत होता. मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी या करचुकवेगिरीवर अंकूश लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी नवीच युक्ती काढली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शहरातील मालमत्तेचे पुनर्सवेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कर्मचाऱ्यांऐवजी हे काम पुणे येथील एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. ही कंपनी मालमत्तेचे सर्वेक्षण करेल. त्यानंतर कोणती इमारत व्यावसायिक आहे व कोणती रहिवासी याचे वर्गीकरण करेल, मालमत्तेचे व्हॅल्युएशन करेल. याबाबतचा सर्व डाटा संगणीकृत करून मनपाच्या स्वाधीन करेल. त्यानंतर मनपा कर वसूल करणार आहे. (शहर प्रतिनिधी)