गोडधोड दूरच, दोनवेळच्या जेवणाची वाढली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:42+5:30

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. याच शासनाच्या मदतीवर त्यांचा चरितार्थ चालतो; मात्र यामध्ये अनियमितता असल्याने त्यांचे सध्या बेहाल सुरु आहेत.

Sweet away, increased anxiety of a two-course meal! | गोडधोड दूरच, दोनवेळच्या जेवणाची वाढली चिंता!

गोडधोड दूरच, दोनवेळच्या जेवणाची वाढली चिंता!

साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : निराधारांना जगण्यासाठी अडचण येऊ नये, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. योजना चांगल्या असल्या तरी  नियमित आणि वेळेवर मानधनच दिले जात नसल्याने या निराधारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकतर अल्प मानधन त्यातच अनियमितता असल्यामुळे त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळी असतानाही सध्यस्थितीत त्यांना सध्या खाण्याची चिंता सतावत आहे.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. याच शासनाच्या मदतीवर त्यांचा चरितार्थ चालतो; मात्र यामध्ये अनियमितता असल्याने त्यांचे सध्या बेहाल सुरु आहेत. विशेषत: संजय गांधी निराधार योजनेचे ऑगस्ट महिन्यापासून  तसेच श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेचे मागील तीन महिन्यांपासून मानधनच आले नाही. 
परिणामी लाभार्थी शासकीय कार्यालय तसेच बँकांमध्ये चकरा मारून आता ठकले आहेत. जास्त तर नाहीच पण आहे ते तरी मानधन नियमित द्या, अशी आर्त हाक सध्या ते करताना दिसत आहेत.

अनेकांना अडचण
उतारवयात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना तसेच निराधारांना शासनाच्या निराधार योजनांचाच आधार असतो. सणवार, औषधोपचार आणि इतर खर्च कसेबसे करीत यातून भागवितात; मात्र मानधन अनियमित मिळत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या दिवसात तरी मानधन मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे; मात्र अद्यापही काही योजनांचे तीन-तीन महिन्यांपासून अनुदानच आले नाही. त्यामुळे दिवाळी सणाचा सर्वत्र झगमगाट असताना निराधारांना हा सण अंधारातच घालवावा लागण्याची शक्यता आहे.

शासनाकडून अनुदान आल्यानंतर ते लाभार्थ्यांना वितरित केले जाते. मागील काही महिन्यांमध्ये काही योजनांतील लाभार्थ्यांचे अनुदान आले नसल्याने ते वितरित झाले नाही. अनुदानासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
- डाॅ. कांचन जगताप
तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
 

Web Title: Sweet away, increased anxiety of a two-course meal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.