बल्लारपुरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:56+5:302021-01-24T04:12:56+5:30
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायम असून पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षात कुत्र्यांनी ९१८ नागरिकांना ...
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायम असून पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षात कुत्र्यांनी ९१८ नागरिकांना चावा घेतला आहे. नगर परिषदतर्फे मोकाट कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतरही कुत्र्यांची फौज वाढतच आहे.
पालिकेने या गंभीर समस्येकड़े त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बल्लारपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील वस्ती विभाग, कालरी परिसर,टेकडी विभागात,जूना बस स्टॅंड,पेपर मिल परिसर, नगर परिषद् चौक, मटन मार्केट व वॉर्डावॉर्डात सर्वत्र कुत्रांची फौज दिसून येते. वाहनाने जाणाऱ्यांच्या मागे धावून चावा घेतात. रात्री अनेकदा कुत्रे रस्त्यावर आडवे आल्याने अपघात घडत आहे. यामुळे बेवारस कुत्रे आजघडीला शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
या संदर्भात नगर परिषदचे माजी सभापती स्वामी रायबरम यांनी सांगितले की एक वर्षाआधी ४३६ कुत्र्यांची नसबंदी केली होती. तसेच कुत्र्यांना बाहेर जंगलात सोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. येथील आरोग्य केंद्रामध्ये गेल्या वर्षी ९१८ कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. तर दरदिवशी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या आबालवृद्धांसह आरोग्य केंद्रात येणाऱ्या महिलांचीही संख्या मोठी आहे.
बॉक्स
पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध राहा
साधारण कुत्रा चावला तर त्यावर औषध आहे. परंतु पिसाळलेला कुत्रा चावला तर ती आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. अशा कुत्र्यापासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. कारण पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
कोट
कुत्र्याची नसबंदी सर्जन नसल्यामुळे येथे होत नाही. डॉक्टर बाहेरून बोलवावा लागतो.
- डॉ.संतोष रायपुरे,पशुवैद्यकीय अधिकारी,बल्लारपूर
कोट
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व नगर परिषदमार्फत डॉग्स शेल्टर होम चालू करण्यात येत असून हा प्रस्ताव नगर परिषदच्या सभेत ठेवण्यात आला आहे. त्यानुसार घनकचरा प्रकल्पाच्या जागेत मोकाट कुत्र्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.
- विजयकुमार सरनाईक,मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर