स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंबांचे सर्वेक्षण
By Admin | Updated: September 2, 2015 00:46 IST2015-09-02T00:46:21+5:302015-09-02T00:46:21+5:30
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाच्या सुचनेवरून ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्याच्या ...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंबांचे सर्वेक्षण
स्वच्छता विभागाच्या सूचना : ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देणार
चंद्रपूर: पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाच्या सुचनेवरून ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने सन २०१२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये कुटुंब संख्येमध्ये वाढ झाली असून वाढीव कुटुंबांना बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ठ करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन सर्वेची पायाभूत सुधारणा करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबईकडून राज्यातील जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.
वाढीव कुटुंबाच्या माहितीचे एकत्रिकरण करुन विहित कालमर्यादेत माहिती सादर करावयाची आहे. यासाठी शासनस्तरावरुन कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ८ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करुन ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या नमुना आठ नुसार वाढलेल्या कुटुंबाची माहिती एकत्रित करुन या वाढीव कुटुंबाना ग्रामसभेत मान्यता घ्यावयाची आहे. पंचायत समितीस्तरावर वाढीव कुटुंबांच्या माहितीचे एकत्रिकरण करणे व माहितीचा गोषवारा १३ सप्टेंबरपर्यंत तयार करावयाचा आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून ग्रामस्तरावर तयार करण्यात आलेली वाढीव कुटुंबाची माहिती ग्रामसभेच्या ठरावासह एकत्रित करुन संबंधित ंपंचायतसमितीस्तरावर १३ सप्टेंबरपूर्वी सादर करावी लागणार आहे. जिल्हास्तरावर माहितीचे एकत्रिकरण करणे व माहितीचा गोषवारा १९ सप्टेंबर २०१५ पर्यंत तयार करावयाच्या आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी वाढीव कुटुंबाची माहिती १९ सप्टेंबरपूर्वी स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषदकडे सादर करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्हास्तरावरुन शासनास २७ सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील वाढीव कुटुंबाची एकत्रित माहिती सादर करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर वाढीव कुटुंबांची माहिती एकत्रित करण्यासाठी ग्रामस्तरावर शासनाने ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना सर्व संबंधिताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी केल्या आहेत. या मोहिमेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांनी याकामी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
स्वच्छ भारत मिशन ग्रामस्तरावर सन २०१२ मध्ये बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. आज प्रत्येक गावात कुटुंब संख्येमध्ये वाढ झालेली आहे. ग्रामस्तरावरील वाढीव कुटुंबांना बेसलाईन सर्वेक्षणात समाविष्ठ करण्यासाठी बेसलाईन सर्वेक्षण सुधारणा करण्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसवेकांनी या कामास प्रथम प्राधान्य देऊन गावातील प्रत्येक वाढीव कुुटुंबाची अद्यावत माहिती एकत्रित करुन ग्रामसभेत ठेवावी.
- रवींद्र मोहिते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी
(पाणी व स्वच्छता), जि.प. चंद्रपूर