गुरुजी होण्यासाठी विद्यार्थ्यांची नकार घंटा
By Admin | Updated: June 29, 2014 23:50 IST2014-06-29T23:50:10+5:302014-06-29T23:50:10+5:30
काही वर्षापूर्वी डीएड करून शिक्षकाची सुरक्षित नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. डीएड अभ्यासक्रमासाठी ते लाखो रुपये भरून खासगी अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचे.

गुरुजी होण्यासाठी विद्यार्थ्यांची नकार घंटा
चंद्रपूर : काही वर्षापूर्वी डीएड करून शिक्षकाची सुरक्षित नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. डीएड अभ्यासक्रमासाठी ते लाखो रुपये भरून खासगी अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचे. आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. अध्यापक विद्यालय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी तयार असतानाही त्यांना विद्यार्थी भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे याविद्यालयांना आता बंद केल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे अनेक अध्यापक विद्यालयातील शिक्षकांवर बेरोजगारींची कुऱ्हाड आली आहे.
जिल्ह्यात २७ अध्यापक विद्यालय आहे. या विद्यालयांमध्ये तब्बल १ हजार ८२५ एवढी विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. मात्र यावर्षी १७ जून या अखेरच्या तारखेपर्यंत केवळ २८६ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्याने उर्वरित जागा शिल्लक राहणार आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज नेण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी यावर्षीपासून प्रत्येक डीएड कॉलेजमध्ये अर्ज विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तरीही याकडे विद्यार्थ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्यातून केवळ ३१८ अर्जांची विक्री झाली आहे. यातील २८६ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. त्यामुळे २७ अध्यापक विद्यालयांसाठी आजच्या घडीला केवळ २८६ विद्यार्थी आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघितल्यास केवळ पाच ते सहा विद्यालयाची प्रवेश क्षमता भागू शकते. मात्र उर्वरित विद्यालयाना विद्यार्थी नसल्याचा प्रश्न कायम आहे. एका विद्यालयामध्ये किमान पाच ते सहा शिक्षक असतात. या विद्यार्थी क्षमतेनुसार जिल्ह्यातील २० विद्यालये बंदच्या मार्गावर आहे. त्यामुळे येथील शिक्षकांना बेरोजगारीची वेळ आली आहे.(नगर प्रतिनिधी)