कठोर निर्बंध केवळ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:16+5:302021-03-18T04:27:16+5:30

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील जिल्ह्यांमध्ये कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, राज्य ...

Strict restrictions only in name | कठोर निर्बंध केवळ नावालाच

कठोर निर्बंध केवळ नावालाच

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील जिल्ह्यांमध्ये कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, राज्य सरकारनेही लाॅकडाऊन टाळायचे असेल तर सतर्क राहा, असा सक्त इशारा दिला आहे. मात्र अद्यापही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. निर्बंध कठोर आहेत, मात्र शहरात ते केवळ नावालाच असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रशासनाला सक्त होण्याचे आदेश दिले असून त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन कोरोनासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईचा आढावा घेतला. एवढेच नाहीतर, लोकप्रतिनिधींना घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी नागरिक मात्र अजूनही कोरोनाला गंभीरतेने घेण्याचे टाळत आहेत. मागील काही दिवसांमध्ये चंद्रपूर महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. मात्र नागरिक मास्क, सॅनिटायझर तसेच गर्दी टाळताना दिसत नाहीत.

बाॅक्स

मनपा, महसूल प्रशासन रस्त्यावर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका तसेच महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकेने २५० नागरिकांवर कारवाई करून १४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला तर महसूल प्रशासनानेही कारवाई सुरू केली आहे. येथील तहसीलदार नीलेश गौंड यांनी स्वत: रस्त्यावर उतरून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली.

बॉक्स

चित्रपटगृहे बंदच

चंद्रपूर शहरात सहा चित्रपटगृहे आहेत. मात्र मागील वर्षभरापासून ती बंदच आहेत. मध्यंतरी प्रशासनाने ५० टक्के उपस्थिती ठेवून चित्रपटगृहे सुरू ठेवण्यासंदर्भात विचारविमर्श सुरू केला होता. मात्र, चित्रपटगृह मालकांना ते परवडणारे नसल्याने आजही चित्रपटगृहे बंदच आहेत.

विवाहसोहळे उत्साहात

जिल्ह्यात विवाहसोहळे मोठ्या उत्साहात सुरू आहेत. काही ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात असले तरी काही ठिकाणी बिनधास्त कार्यक्रम घेतले जात आहेत. कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाची परवानगी तेवढी काढली जात आहे. ५० जणांच्या उपस्थितीचे बंधन असतानाही नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

अंत्यविधीतही गर्दी

अंत्यविधीसाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या उपस्थितीच्या बंधनाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. जवळचा नातेवाईक म्हणून प्रत्येक जण अंत्यविधीसाठी जाताना दिसून येत आहे. येथील मोक्षधाम तसेच अन्य ठिकाणीही हा नियम डावलला जात आहे. दु:खद घटनेप्रसंगी प्रशासनही कारवाईसाठी हतबल होत आहे.

कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू

लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेचे कार्यालय वगळून सर्व काही बंद होते. मात्र, कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर कार्यालये नियमित सुरू झाली. विशेष म्हणजे, प्रत्येक शासकीय कार्यालय सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असून, अनेकवेळा शासकीय कार्यालयांतही कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.

बोर्ड नाहीच

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवल्यास त्या घराच्या दारावर बोर्ड लावला जातो. लाॅकडाऊन असतानाही हा नियम पाळला जात होता. विशेष म्हणजे, रुग्ण आढळल्यानंतर त्या घराच्या परिसरामध्ये कठडे उभारले जात होते. आता मात्र रुग्ण असलेल्या घरावर साधा बोर्डसुद्धा लावला जात नसून या नियमालाही प्रशासनाने हरताळ फासला आहे.

Web Title: Strict restrictions only in name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.