स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:12 IST2018-08-13T23:11:58+5:302018-08-13T23:12:15+5:30
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोमवारी पहिल्यांदाच गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-अडेगाव मार्गावर एसटी सुरु झाली. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटली आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर (चंद्रपूर) : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सोमवारी पहिल्यांदाच गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-अडेगाव मार्गावर एसटी सुरु झाली. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी-भंगाराम तळोधी- अडेगाव या मार्गावर पहिल्यांदाच सकाळी बस येताना दिसल्यामुळे मार्गावरील ग्रामस्थांना आश्चर्य वाटले. यामुळे गावकरी आनंदात नाहून निघाले. बस पाहण्यासाठी गावकºयांंनी एकच गर्दी केली होती. दरम्यान गणेशपिपरी या गावात बसचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गोंडपिपरी पंचायत समितीचे उपसभापती मनीष वासमवार, गणेशपिपरीच्या सरपंच किरण वासमवार या दाम्पत्यांनी बसचे विधिवत पूजन करून लोकवाहिणीचे स्वागत केले.
या मार्गावर बस नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेशपिपरी मार्गावरील भाजीपाला विक्रेते, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी अशा अनेक घटकांतील नागरिकांना गोंडपिपरी येथे जावे लागते. मात्र या पूर्वी या मार्गावर बस नसल्याने प्रवाश्यांना मिळेल त्या साधनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या मार्गावर बसफेरी सुरु करण्यासाठी गोंडपिपरीचे उपसभापती मनीष वासमवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान सोमवारपासून बसफेरी सुरु करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची सोय निर्माण झाली आहे.