मूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार
By Admin | Updated: September 2, 2015 00:50 IST2015-09-02T00:50:01+5:302015-09-02T00:50:01+5:30
जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे.

मूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार
सुधीर मुनगंटीवार : ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक
मूल : जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे. बुद्धीमत्ता आपल्या देशात वास करीत असून आजही इतर देशात भारताचे नाव घेतले जाते. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर बुद्धिमान घडणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक आहे, असे मत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मूल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने रामलिला भवन मूल येथे आयोजित दहावी व बारावीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ.एन.एम. कोकोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र गीते, तहसीलदार राजेश सरवदे, पंचायत समिती सदस्य संजय मारकवार, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे आदी मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी मूल शहरातील मुख्य समस्या ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर मांडल्या.
यावेळी सामाजिक कार्यासाठी डॉ.रामचंद्र दांडेकर, क्रीडा क्षेत्रासाठी मिथुन महाडोरे, वाहतूक शिपाई नरेंद्र अंडेलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितेगावच्या पदविधर शिक्षिका जयश्री दिक्षीत तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विनायक रेकलवार यांनी केले. प्रास्ताविक संजय पडोळे तर आभार गुरू गुरुनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे रामकृष्ण नखाते, रमेश माहुरपवार, राजू गेडाम, दीपक देशपांडे, भोजराज गोवर्धन, गंगाधर कुनघाडकर, वासुदेव आगडे, युवराज चावरे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य डॉ. कोकाडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे असते. नियोजनबद्ध आखणी केली व मनात जिद्द, आत्मविश्वास असला तर जीवनात नक्कीच यश मिळते हे आपल्या स्वत:च्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. भारत २०२० पर्यंत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ते केवळ बुद्धिमत्तेच्या बळावरच, त्यामुळे प्रत्येकानी उच्चशिक्षित व्हावे असे प्राचार्य कोकाडे म्हणाले.