मूलमधील सात लाखांचा कत्तलखाना बेवारस
By Admin | Updated: July 7, 2014 23:30 IST2014-07-07T23:30:00+5:302014-07-07T23:30:00+5:30
बकऱ्याच्या कत्तली भर रस्त्यावर न करता एका बंदीस्त खोलीत करता यावे जेणेकरुन आरोग्याला बाधा पोहचणार नाही या उदात्त हेतुने गेल्या दहा वर्षांपूर्वी सात लाख रुपये खर्च करून आठवडी बाजार

मूलमधील सात लाखांचा कत्तलखाना बेवारस
मूल : बकऱ्याच्या कत्तली भर रस्त्यावर न करता एका बंदीस्त खोलीत करता यावे जेणेकरुन आरोग्याला बाधा पोहचणार नाही या उदात्त हेतुने गेल्या दहा वर्षांपूर्वी सात लाख रुपये खर्च करून आठवडी बाजार परिसरात कत्तलखाना बांंधण्यात आला. मात्र पदाधिकारी व प्रशासन यांच्या दुर्लक्षितपणामुळे कत्तलखान्याचे दिवाळे निघाले. अल्पावधीतच कत्तलखान्याची दारे व खिडक्या अज्ञात चोरांनी लंपास केले. आजच्या स्थितीत कत्तलखान्यात चक्क डुकरे साठविली जातात. मात्र नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते.
नगरपरिषद मूल अंतर्गत येणाऱ्या वार्ड नं.११ मधील आठवडी बाजाराजवळील परिसरात बकऱ्याची कत्तल एका बंदीस्त खोलीत करता यावी या हेतुने १० वर्षांपूर्वी जवळपास ७ ते ८ लाख रुपये खर्च करून कत्तलखाना बांधण्यात आला. बांधकामाच्या वेळी दरवाजे, खिडक्या, छताला स्टाईल आदी सुशोभित प्रकारे कत्तलखाना बांधण्यात आला. मात्र अल्पावधीत हा कत्तलखाना बेवारस झाला.
यातच अज्ञात चोरट्यानी याचा फायदा घेत खिडक्या, दारे व इतर महत्त्वाच्या वस्तू लंपास केल्या. न.प. पदाधिकारी व प्रशासन यांचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष आल्याने कत्तलखाना बेवारस झाला. आजही कत्तलखान्याऐवजी रस्त्यावरच बकऱ्यांची कत्तल केली जात आहे. मात्र डागडूजी करून कत्तलखान्याची दुरुस्ती करण्यात पदाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी पुढे धजावत नसल्याचे दिसून येते. बकरे कत्तल करणाऱ्यांच्या मते, सदर कत्तलखान्याची दुरुस्ती करावी, विद्युत पाणी व्यवस्था करण्यात यावी. तसेच मासे विक्रीसुद्धा याच कत्तल खान्यात करण्यात यावी, अशी संबंधित व्यावसायिकांची मागणी आहे.
याकडे न.प. प्रशासन गांभीर्याने येत नसल्याने कत्तलखान्यात डुकरे साठविली जातात. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात मेंदुज्वरासारखे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भर रस्त्यावर बकरे व कोंंबड्या कावली जात असल्याने वार्ड परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येते. त्यामुळे रोगाचा शक्यतासुद्धा बळावली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष घालून कत्तल खाण्याची दुरुस्ती करावी व परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी वार्ड परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)