१९ लाखांवर नागरिकांची सिकलसेल तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:17+5:30
सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे.

१९ लाखांवर नागरिकांची सिकलसेल तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आरोग्य प्रशासनाने यावर्षी जिल्ह्यात १९ लाख ८५ हजार २०४ जणांची सिकलसेल तपासणी केली आहे. यामध्ये २ हजार ७०२ जण सिकलसेल रुग्ण, तर ३१ हजार ७३१ व्यक्ती सिकलसेलचे वाहन आढळून आले आहेत.
सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गावागावात जनजागृती करून शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी केली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त सिकलसेल रुग्णांच्या व्यथा व अपेक्षा या विषयावर पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, अधिपरिचारीका माया आत्राम, प्राचार्य कळसंगे, उपअभियंता नीलेश खाडे, धीरज कासर्लेवार, संतोष चात्रेशवार, भारती तितरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडील जबाबदार असतात. परंतु या आजाराच्या नियंत्रणांकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकलसेल तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो.
अशी घ्या काळजी
वाहक व्यक्ती तसेच वाहक- ग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करु नये. सिकलसेल रुग्णांमध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे, जंतुसंसर्ग होणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, भरपूर आहार घेणे व नियमित फोलिक अॅसिड गोळ्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजारी पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.