आदिवासींचे आबादी प्लॉट बळकावण्यासाठी सरपंचांनी केला पदाचा गैरवापर

By Admin | Updated: September 3, 2015 00:40 IST2015-09-03T00:40:49+5:302015-09-03T00:40:49+5:30

शासकीय जागेवर आबादी प्लॉट मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट स्वत: व कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी सरपंच पदाचा गैरवापर ...

Sarpanch misused post office to grab tribal population plot | आदिवासींचे आबादी प्लॉट बळकावण्यासाठी सरपंचांनी केला पदाचा गैरवापर

आदिवासींचे आबादी प्लॉट बळकावण्यासाठी सरपंचांनी केला पदाचा गैरवापर

वडाळा : शासकीय जागेवर आबादी प्लॉट मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट स्वत: व कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी सरपंच पदाचा गैरवापर केल्याचे प्रकरण दादापूर येथे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्याकडे केली आहे.
शेगाव (बु.) जवळ असलेल्या दादापूर येथे सन १९९० ला शासकीय जागेवर आबादी प्लाट काढून गावातील गरजूवंत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. त्याची नोंद ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात घेवून तत्कालीन तहसीलदार यांनी त्या जागेचा ताबा लाभार्थ्यांना दिला. सदर लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम केले. गरिबांनी मात्र अजूनपर्यंत घरे बांधले नाही. त्यामुळे रिकाम्या जागा असल्याची संधी साधून २८ मे २०११ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच छाया लेडांगे यांनी आपल्या मर्जीतील सदस्यांना हाताशी धरून विजय विठ्ठल सोनवाने यांच्या नावे असलेला आबादी प्लाट क्र. ७२ हे स्वत:चे नावे व देवराव बेंडू नन्नावरे यांच्या नावे असलेला आबादी प्लाट क्र. ७५ सरपंच यांचे पती भाऊराव गंगाराम लेडांगे यांच्या नावे करण्याचा ठराव मंजूर केला.
त्याला प्लाटधारकाची मंजुरीसुद्धा घेण्यात आली नाही. ग्रामसभेत सुद्धा हा विषय आणून मंजुरी घेण्यात आली नाही. मात्र सदर दोन्ही प्लाट ग्रामपंचायत व तलाठी रेकार्डला परस्पर चढविण्यात आल्याने आदिवासी प्लाटधारक लाभार्थ्यावर अन्याय झाला आहे.
मूळ दोन्ही प्लॉटधारकांची नावे कमी करून विजय विठ्ठल सोनवाने यांचे प्लाट क्र. ७२ वर छाया भाऊराव लेडांगे व देवराव बेंडू नन्नावरे यांचे प्लाट क्र. ७५ वर भाऊराव गंगाराम लेडांगे यांची नावे ग्रामपंचायत व तलाठी रेकॉर्डला चढविण्यात आली आणि सरपंच व त्यांचे पती यांनी दोन्ही जागेवर अतिक्रमण करून सदर प्लाटचे पट्टे आमचे नावे करून देण्याबाबत तहसीलदार वरोरा यांचे अर्ज केला. तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, या प्रकरणात उपसरपंच भास्कर जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य अण्णा नन्नावरे यांचा सुद्धा सहभाग असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
हे प्रकरण नियमबाह्य असून आदिवासीवर अन्याय करणारे आहे. त्याचबरोबर स्वत:च्या स्वार्थासाठी आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट बळकावण्याचे प्रयत्नात सरपंच यांनी पदाचा गैरवापर केला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून सरपंचावर कारवाई करण्यासाठी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासकीय अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Sarpanch misused post office to grab tribal population plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.