संदीप यासलवारने जामीन नाकारला
By Admin | Updated: September 11, 2014 23:24 IST2014-09-11T23:24:16+5:302014-09-11T23:24:16+5:30
बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला

संदीप यासलवारने जामीन नाकारला
न्यायालयीन कोठडीत रवानगी : अटकेविरोधात अन्नत्याग
ंचंद्रपूर : बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला शब्द न पाळल्याचा आरोप करीत संदीपने जामीन घेण्यास नकार देत न्यायालयीन कोठडीत जाणे पसंत केले. विशेष म्हणजे, या कारवाईविरोधात त्याने न्यायालयीन कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
बाबपेठ येथील उड्डाणपुलाच्या मागणीसाठी १३ आॅगस्टला संदीपने बाबूपेठ परिसरात नेताजी चौकातील नालमवार यांच्या घरी लावलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले होते. तब्बल १० तास तो टॉवरवरच होता. दरम्यानच्या काळात संतप्त नागरिकही रस्त्यावर उतरल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी १२ वाजतापासून तर रात्री १०.३० वाजेयर्पंत त्याचे हे आंदोलन सुरू होते. खाली उतरविण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही तो उतरण्यास तयार नव्हता. कुणीही जनप्रतिनिधीने येऊन बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन द्यावे, तेव्हाच आपण उतरू, अशी भूमिका त्याने घेतली होती.
अखेर रात्री १०.३० वाजता तहसिलदार शिंंदे यांनी कसलीही कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्यावर संदीप खाली उतरला होता.
मात्र, ३ सप्टेंबरला शहर पोलिसांनी संदीपविरूद्ध भादंवि ३०९ कलमानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांची ही भूमिका अन्यायकारक असल्याचे त्याने ४ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत सांगितले होते. दरम्यान, आज ११ सप्टेंबरला शहर पोलिसांनी त्याच्या घरून सकाळी १०. ३० वाजता त्याला अटक केली. त्यानंतर दुपारी त्याला न्यालायलात हजर केले असता, न्यायाधिशांनी जमानतदाराबद्दल विचारणा केली. मात्र, आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याने या निषेधार्थ जमानत नाकारत असल्याने सांगून त्याने जमानत घेण्यास नकार दिला. अखेर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना त्याने प्रशासनावर टीका केली. कारवाई न करण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने आपल्याविरूद्ध कलमा लावल्या. ही कारवाई चुकीची असल्याने आपण या विरोधात न्यायालयीन कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याने संदीपने सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)