रेती तस्करांकडून २१ लाखांवर दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:49+5:30
यावर्षी जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही व्हायचा आहे. तरीही काही वाहनमालक रेतीची तस्करी करून गरजुंकडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याने नदी-नाल्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रेतीच्या अवैध तस्करी प्रकरणी चंद्रपूर तहसीलदारांनी धडक कारवाई सुरू केली असून मागील काही दिवसांमध्ये विविध २२ वाहनांवर कारवाई करीत या वाहनांच्या मालकांकडून तब्बल २१ लाख ६८ हजारांचा दंड वसुल केला आहे. या कारवाहीमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे, या तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निगरानी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही व्हायचा आहे. तरीही काही वाहनमालक रेतीची तस्करी करून गरजुंकडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याने नदी-नाल्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. यावर आळा घालण्यासाठी नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार निलेश गौंड यांनी कारवाई करणे सुरु केले आहे. यासाठी त्यांनी नायब तहसीलदार, मंडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निगरानी पथकाची निर्मिती केली आहे. सदर पथक दिवसरात्र या तस्करांवर लक्ष ठेवून आहेत. याचाच परिणाम म्हणून मागील महिनाभरात रेती तस्करी करणारे २२ वाहने जप्त करण्यात आले असून त्यांच्या मालकांकडून दंड वसुल करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संदीप रॉय, प्रल्हाद कामडी रा. कोसारा, वाहन चालक सागर मोहन मोहरे रा. पडोली यांच्यासह ५ मजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलेश गौंड, अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंधक पथक प्रमुख राजू धांडे, तलाठी प्रकाश सुर्वे, प्रविण वरभे, रवींद्र तल्हार, राहूल भोंगळे, शैलेश दुव्वावार, दिलीप पिल्लई, अनवर शेख, विशाल कुºहेवार आदींनी केली.
जप्त केलेले ट्रॅक्टर पळविणे भोवले
रेती तस्करी प्रकरणी जप्त केलेला ट्रॅक्टर चंद्रपूर तहसील कार्यालय परिसरातून पळविणे चाांगलेच भोवले असून आरोपींवर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोसारा नदीतून ट्रक्टरद्वारे रेतीची तस्करी करताना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ट्रॅ्क्टर जप्त करून तहसील कार्यालयात ठेवला होता. सदर ट्रॅक्टर आणि ट्रालीवर नंबर नव्हता. हिच संधी साधत तहसील कार्यालयातू ट्रॅक्टर तसेच ट्राली पळवून नेण्यात आली. यासंदर्भात तहसीलदारांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार द्या, कारवाई करू
रेतीची तस्करी करून वाहतूक करणाºयांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. रेतीची तस्करी करताना आढळल्यास तहसील कार्यालयात तक्रार द्या, तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने कण्यात आले आहे.
रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी निगरानी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर पथकाद्वारे तपासणी करण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीत रेतीची तस्करी होणार नाही यासाठी प्रयत्न सुरु आहे. यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे. रेती तस्करासंबंधी तक्रार असल्यास तहसील प्रशासनाला कळवावे.
- निलेश गौंड, तहसीलदार, चंद्रपूर