धावत्या ट्रकला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:57+5:302021-03-07T04:24:57+5:30
वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे अनर्थ टळला : मात्र लाखो रुपयांचे नुकसान तळोधी बा. - नागपूरहून आलापल्ली, अहेरीला माल भरून निघालेल्या ...

धावत्या ट्रकला लागली आग
वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे अनर्थ टळला : मात्र लाखो रुपयांचे नुकसान
तळोधी बा. - नागपूरहून आलापल्ली, अहेरीला माल भरून निघालेल्या चालत्या ट्रकला आग लागली. दरम्यान ट्रकमधून धूर निघत असल्याचे तळोधी बा. वाहतूक पोलिसांना लक्षात आल्याने ट्रकला थांबवून जेसीबीच्या सहाय्याने आडवे पाडून पाण्याची फवारणी केल्याने जीवितहानी टळली. मात्र ट्रकमधील साहित्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी घडली.
सिदेंवाही गुड्स गॅरेजचा ट्रक (क्र. एमएच ४० एन ००९३) टिना, लोखंडी सळाक, किराणा सामान, कापड व जनरल साहित्य भरून शनिवारी सकाळी नागपूरवरून आलापल्ली येथे जाण्यास निघाला असता, तळोधी बा. वाहतूक पोलिसांनी ओव्हरलोड असल्याने ट्रकला थांबविले असता त्या ट्रकमधून धूर निघत असल्याचे पोलिसांना दिसले. लगेचच बाजूला असलेल्या आंबोरकर सर्व्हिस सेंटरमधून पाण्याच्या फवारा करण्यात आला. मात्र आगीचा भडका अचानक वाढत असल्याने रोडवर काम करीत असलेल्या जेसीबीच्या सहाय्याने ट्रकला आडवे पाडून माल काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तळोधी बा. पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र खैरकर, वाहतूक पोलीस संजय मांढरे, धुडसे, हंसराज सिडाम यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र ट्रकमध्ये असलेला माल आगीमुळे जळून खाक झाला. आग कशामुळे लागली, हे अजूनपर्यंत कळू शकले नाही.