१५ रुपयांच्या पाण्यासाठी आरपीएफने झाडली गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:28 IST2020-03-20T15:27:58+5:302020-03-20T15:28:35+5:30
पाण्याची बाटली दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली.

१५ रुपयांच्या पाण्यासाठी आरपीएफने झाडली गोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिल्लीकडून चेन्नईकडे जाणाऱ्या जीटी एक्सप्रेस क्रमांक १२६१६ या रेल्वे गाडीमधे केवळ १५ रुपयांची पाण्याच्या बॉटल दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली.
दिल्लीहून येणारी जीटी एक्स्प्रेस बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ४ वाजता रवाना झाली. पुढे रात्री ९. ३० वाजता काजीपेठ ते खम्ममच्या दरम्यान गाडीत गस्तीवर असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा सिपाही पी. अशोककुमार (बॅच नंबर ४१५७) हा पेन्ट्री कारमध्ये जाऊन मॅनेजर सुनील तोमर रा.भिंड, मध्यप्रदेश यांना पैसे न देता पाण्याची बॉटल मागू लागला. त्याने न दिल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर आरपीएफ पी. अशोककुमार याने रागाच्या भरात सुनीलवर गोळी झाडली. ती सुनील यांच्या छातीत घुसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना लगेच खम्मम रेल्वे पोलीस व आयआरसीटीसी विभागाला ट्विटरवर दिली व खम्मम रेल्वेस्थानक येताच गोळी मारणाऱ्या पी. अशोककुमार यांना अटक करण्यात आली. तसेच जखमी सुनील तोमर यांना खम्ममच्या इस्पितळात भरती करण्यात आले आहे.