पिपरी येथील रस्ता नऊ वर्षांपासून रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:57+5:30
भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भुमिपूजनानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या कामावर गावातील जॉबकार्डधारक यायचे. आठ दिवस काम सुरळीत सुरु होते.

पिपरी येथील रस्ता नऊ वर्षांपासून रखडला
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती: येथून जवळच असलेल्या पिपरी- घोनाड या पांदण रस्त्याचे काम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०११ मध्ये सुरु करण्यात आले होते. या कामासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर काम सुरु झाले. मात्र, त्यानंतर कमी मजुरी असल्याचे कारण समोर करीत मजुरांनी कामावर येणे बंद केले. परिणामी मागील ९ वर्षांपासून रस्ता पूर्ण झालाच नसल्याने ग्रामस्थांना चिखल तुडवीत शेतात जावे लागत आहे. त्यामुळे मजुरांऐवजी यंत्राद्वारे रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत.
भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भुमिपूजनानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या कामावर गावातील जॉबकार्डधारक यायचे. आठ दिवस काम सुरळीत सुरु होते. रोजगार हमी योजनेची मजुरी कमी असल्याने मजुरांनी येणे बंद केले. या कामापेक्षा शेतातील मजुरी अधिक मिळत असल्याचे कारण मजूर देत आहेत. प्रशासकीय कारणामुळे सदर काम मनुष्यबळाने करायचे असल्याने यंत्राद्वारे करताना अडचण निर्माण झाली आणि काम बंद पडले. कामाची सुरुवात झाली त्यावेळी येथील विद्यमान उपसरपंच संदीप खुटेमाटे यांच्याकडेच प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या पूर्णत्वासाठी प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुराव केला. मात्र, अजुनही या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा जागी झाली नाही. त्यामुळे निधी मंजूर होऊनही मजुरांअभावी पांदण रस्त्याचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून येथील नागरिकांना चिखत तुडवित शेतात जावे लागत आहे. त्यामुळे यंत्राद्वारे या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची मागणी केली जात आहे.
पिपरी- घोनाड या पांदण रस्त्याच्या कामासाठी निधी आला आहे. मात्र, कामावर मजूर उपलब्ध होत नसल्याने काम थांबले आहे. मागील ९ वर्षांपासूनची स्थिती कायम आहे. त्यामुळे संबंधित विभागाने हे काम मनुष्यबळाने न करता यंत्राद्वारे करण्याची परवानही द्यावी. यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला आहे.
- संदीप खुटेमाटे, उपसरपंच, पिपरी (भद्रावती)