नद्यांना कोर्ट नव्हे, समाजमनच वाचवू शकते
By Admin | Updated: February 1, 2016 00:52 IST2016-02-01T00:52:01+5:302016-02-01T00:52:01+5:30
नद्यांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र अलीकडे त्या प्रदूषित झाल्या आहेत. मानवी हस्तक्षेप त्यावर वाढल्याने या जीवनवाहिन्या कोजमेल्या आहेत.

नद्यांना कोर्ट नव्हे, समाजमनच वाचवू शकते
जल परिषदेला प्रारंभ : राजेंद्र सिंग यांचे जनतेला आवाहन
चंद्रपूर : नद्यांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र अलीकडे त्या प्रदूषित झाल्या आहेत. मानवी हस्तक्षेप त्यावर वाढल्याने या जीवनवाहिन्या कोजमेल्या आहेत. त्यांना न्यायालय नव्हे तर, सरकार आणि समाजमनच वाचवू शकते, त्यासाठी त्यांनी पुढे यावे, असे आवाहन रेमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग यांनी केले.
चंद्रपुरात रविवारपासून दोन दिवसीय जलपरिषद आणि कृषी प्रदर्शनीला स्थानिक क्लब ग्राऊंडवर प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर होते. आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार नाना श्यामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, अॅड. रविंद्र भागवत, अॅड. बाबासाहेब वासाडे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्याकारी अधिकारी कल्याणकर, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. राजेंद्रसिंग म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही योजना भ्रष्टाचाराकडून सदाचाराकडे नेणारी योजना आहे. यासारख्या योजना प्रभावीपणे राबविल्यास दुष्काळावर मात करुन शेतीला सिंचनासाठी मदत होणार आहे. चंद्रपूरचे प्रदुषणाचे वातावरण बदलविण्यासाठी जंगल, जमीन आणि पाणी याकडे विशेष लक्ष दयावे लागणार आहे. जंगलातून वाहणा-या नदयांचा प्रवाह मंद करुन तो अडवूण भूगर्भात साठविला पाहिजे. त्यामुळे भूगभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
महाराष्ट्र शासनाने लोकसहभागातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार काढून राजेंद्रसिंह म्हणाले, भविष्यातील पाणी टंचाई व सिंचन वाढीवर नियोजनात्मक केलेले प्रयत्न म्हणजेच जलयुक्त शिवार योजना आहे. इरई नदीचे योग्य नियोजन केल्यास चंद्रपरातील पुराची स्थिती आणि पाण्याची टंचाई या समस्या आपोआप दूर होती, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोपटराव पवार म्हणाले, शेती, पाणी आणि जोडधंदे एकत्र आल्यास शेतीचे चित्र बदललेले असेल. विदर्भात पाणी असतांना सुध्दा शेतकरी आत्महत्या करीत आहे, हे थांबले पाहिजे. शेतकरी खरीपाकडून रब्बीकडे जात आहे. रब्बीसाठी संरक्षीत पाणी देणे गरजेचे आहे. यंत्रणांच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचे सांगून पवार म्हणाले, गावातून काम करणारी यंत्रणा बाजूला झाली की कामाची गती मंदावते. जलसंधारणाच्या कामात महाराष्ट्राने देशापुढे आदर्श निर्माण केला आहे. जलयुक्त मधून केवळ बंधारेच नाही तर इतर जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करावी. आता १४ व्या आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार असल्यामुळे पाच वर्षांचा आराखडा गावाने तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. रविंद्र भागवत यांनी स्वयंपूर्ण शेतकरी निर्माण करण्यासाठी योग्य तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता त्यांनी विशद केली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. कार्यक्रमाला अनेक गावातील सरपंच, शेतकरी, बचतगटांच्या महिला व नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)