जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुया
By Admin | Updated: August 17, 2015 00:41 IST2015-08-17T00:41:48+5:302015-08-17T00:41:48+5:30
१० महिन्यांच्या काळात सरकारने जनहिताचे व लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहे. येत्या काळात आणखी लोकहितकारी निर्णय घेण्यासाठी शासन कटिबध्द आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुया
सुधीर मुनगंटीवार : स्वातंत्र्यदिनी जिल्हावासीयांना संबोधन
चंद्रपूर: १० महिन्यांच्या काळात सरकारने जनहिताचे व लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहे. येत्या काळात आणखी लोकहितकारी निर्णय घेण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा यासारखे दुरदृष्टीचे निर्णय घेऊन सरकारने जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. आपण आजच्या स्वातंत्रदिनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करु या, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते स्वातंत्र्याच्या ६८ व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, स्वातंत्र सैनिक, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यातील व्याघ्र वैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखीत करत वन पर्यटनाला चालना मिळावी, या दृष्टीने जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याचे मान्य केल्यामुळे त्यांनी जिल्हावासियांतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी शासनाने विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्याचे कार्यालय मंजूर केले असून हे कार्यालय लवकरच चंद्रपूर येथे कार्यरत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी जिल्हयातील विविध विकास कामाचा आढावा घेतला. चंद्रपूर शहरातील सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमी बांधकाम, विद्युत व्यवस्था, नेताजी नगर भवनाची दुरुस्ती, अभ्यासिकेचे बांधकाम व इतर विकास कामे करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर नगरपरिषदा व नगरपंचायतींना ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बाबुपेठ उड्डाण पुलाचे बांधकामही हाती घेण्याच्या दृष्टीने तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हयातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात येत असून ११५ कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी विविध योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.
जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाचा लोकसहभागातून पुढे जाणारा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेत जिल्ह्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली असून या अभियानात महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, नरेगा या सर्व यंत्रणांचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या वतीने विकासाच्या नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात असून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नवचेतना हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. मॉडल शाळा बनविणे, अंगणवाडयाचे अद्यावतीकरण, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आदी कार्यक्रम या मिशनमध्ये राबविले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील ७० टक्क्यापेक्षा जास्त ग्राम पंचायतमधील नागरिक उघडयावर शौचास जाणार नाहीत, यासंबंधीचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हयातील ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट सीएसआर निधीतून करण्याची योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. हळद क्लस्टर तयार करण्यासोबतच भाजीपाला क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)