रेन वॉटर हॉर्वेस्टिंग काळाची गरज
By Admin | Updated: July 6, 2015 00:47 IST2015-07-06T00:47:47+5:302015-07-06T00:47:47+5:30
देशातील विविध भागामध्ये पाण्याची समस्या नेहमी जाणवते.

रेन वॉटर हॉर्वेस्टिंग काळाची गरज
रमाकांत लोधे यांनी केला घरीच प्रयोग : इतरांनीही घ्यावा आदर्श
नवरगाव : देशातील विविध भागामध्ये पाण्याची समस्या नेहमी जाणवते. आपल्याकडे विशेषत: पावसाळ्यातच पाणी येते आणि वाहून जाते. त्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असा नारा शासनाला द्यावा लावला. यासाठी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याचे संधारण) ही काळाची गरज आहे.
आज सर्वत्र गावात आणि शेतात बोअरवेल खोदल्या जात असून त्याद्वारे जमिनीतील पाणी ओढण्याचे काम सुरू आहे. मात्र जमिनीमध्ये पाणी मुरविण्याचे कामही आवश्यक आहे. याची जाणीव झाल्याने सिंदेवाही पंचायत समितीचे उपसभापती रमाकांत लोधे यांनी रत्नापूर येथे आपल्या निवासस्थानी चार-पाच हजार रुपये खर्च करून रेन वॉटर हॉर्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याचे संधारण) चा प्रयोग सुरू केला. त्यांच्या घराच्या ३५०० ते ४००० हजार स्क्वे.फुट स्लॅबवरील पावसाचे पाणी विहिरीत टाकण्याचा अभिनव व यशस्वी प्रयोग केला आहे. पावसाचे पाणी विहिरीत टाकण्यासाठी स्लॅबला पीव्हीसी पाईप ७५ एम.एम., ४ केजी त्यांनी एकत्र जोेडले व ते आवारातील विहिरीपर्यंत आणले. त्यामुळे स्लॅबवर पडलेले पावसाचे पाणी इतरत्र न जाता विहिरीमध्ये पाईपद्वारे येते व विहिरीतच मुरते.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई भासते. भुजल पातळी खाली जाते. विहिरीत पाणी राहत नाही.
ग्रामीण भागामध्ये नळयोजना असली तरी तीन-चार दिवसानंतर नळाला पाणी येते. नदीलाच पाणी नाही तर नळाला कुठून येणार, अशी ओरड सुरू होते. उन्हाळ्यामध्ये एका व्यक्तीला साधारणत: ४० लिटर पाणी लागते, असे शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. समजा ६०० चौरस फुट छपराचे पाणी विहिरीत टाकले किंवा जमिनीत मुरवले तर एका वर्षाला अंदाजे पर्जन्यमानानुसार ६० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. हे ६० हजार लिटर पाणी वर्षभरात सरकारी आकड्यानुसार चार व्यक्तींच्या उपयोगात येते. प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या घराच्या छपरावरील पाणी विहिरीत मुरवले तर भविष्यात कधी पाणी टंचाई भासणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजस्थानमध्ये रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची देशाला अत्यंत गरज असल्याचे मत प्रकट केले. त्याच धर्तीवर रमाकांत लोधे यांनी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ स्वत:च्या घरी करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे. तसेच दुसऱ्या इमारतीवरील पाणीसुद्धा दुसऱ्या विहिरीत सोडण्याचा उपक्रमही केला असल्याने त्यांच्या या प्रयोगाचे अनेकांनी अनुकरण करावे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर आपण मात करू शकतो. (वार्ताहर)