फुलोऱ्यावरील धानाला पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:51+5:30
दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हमणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सततच्या पावसाचा फुलोऱ्यावर आलेल्या धानाला फटका बसत आहे. धानाचे फूल जळत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उच्च प्रतीच्या धानावर कीडीचे आक्रमण झाले आहे. पावसामुळे फवारणीही निष्प्रभ ठरत असून शेतकरी हवालदिल झाले आहे.
गत २५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसरला असून काही ठिकाणी तो फुलोऱ्यांवर आला आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने झालेला पाऊस पिकांसाठी समाधानकारक असला तरी आता मात्र सततच्या पावसाचा फटका हलक्याप्रतीच्या धानाला बसत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात हलक्याप्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. सध्या फुलोºयावरील धानाला पावसाचा फटका बसत आहे. निसवून १५ ते २० दिवस झालेल्या धानाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. फूल जळत असल्याने धान भरत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकºयांचे म्हमणे आहे. सातत्याने महागडी फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. या परिस्थितीतही शेतकºयांनी सिंचन करुन धान जगविला. सप्टेंबर महिन्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. शेतकºयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. मात्र १५ दिवसांपासून पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.
तीन वर्षांपासून नापिकी
मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी नाही, तर पुढल्यावर्षी तरी चांगले पिक येईल, या आशेने शेतकरी राबराब राबून कष्ट करीत. मात्र लहरी निसर्गामुळे सर्व व्यर्थ गेल्यागत परिस्थिती बळीराजासमोर निर्माण झाली आहे. शासनाने खरीप पिकांच्या लागवडीसाठी बी-बियाणे पुरविण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. त्यामुळे याही वर्षी शेतकºयांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार आहे.
कृषी विभागाने करावे मार्गदर्शन
काही भागात धान पिकावर किडीचे आक्रमण झाले आहे. शेतकरी आपल्या पद्धतीने महागडी औषधी फवारत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. कीड नियंत्रणासाठी कोणते औषध फवाराचे, याबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
पावसामुळे खरीप पिके धोक्यात
साधारणत: दीड ते दोन महिन्यांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांना फटका बसला आहे. पीक व्यवस्थापनावरील खर्चातवाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.