गैरसमजामुळे गरीब, कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 05:00 IST2021-03-17T05:00:00+5:302021-03-17T05:00:30+5:30
केंद्र शासनाने कोविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रन्टलाईन वर्करना लस देण्याचा निर्णय घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डीएचओ, सीएस व एमओएच कार्यालय अंतर्गत शासकीय, खासगी, केंद्रीय आरोग्य कर्मचारी अशा एकूण २३ हजार ३६६१ जणांची नोंदणी केली. १६ जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला.

गैरसमजामुळे गरीब, कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोराेना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरात ६९ केंद्रांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला. सोमवार (दि. १५) पर्यंत ५६ हजार ८६ जणांनी प्रतिबंधात्मक लस घेतली. मात्र, कष्टकरी व गोरगरीब समुदायात कोरोना लसीबाबत काही गैरसमज, शंका व अफवा असल्याने सुशिक्षित व सुखासीन मध्यवर्गीय समुदायच उत्साहाने लस घेण्यात सरसावल्याचे चित्र चंद्रपूर शहर व तालुकास्थळांवरील केंद्रांच्या पाहणीतून दिसून आले आहे.
केंद्र शासनाने कोविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रन्टलाईन वर्करना लस देण्याचा निर्णय घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डीएचओ, सीएस व एमओएच कार्यालय अंतर्गत शासकीय, खासगी, केंद्रीय आरोग्य कर्मचारी अशा एकूण २३ हजार ३६६१ जणांची नोंदणी केली. १६ जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आता उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० पेक्षा जास्त वय तसेच ६० ते ४५ वयोगटातील गंभीर आजारी असणाऱ्यांना लस देणे सुरू झाले. ही लस टोचून घेण्यात मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त नोकरदार, व्यावसायिक व सुशिक्षित समाज घटकांतीलच नागरिक पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. मात्र, प्रामुख्याने कष्टकरी व गोरगरीब समुदायातील नागरिक अजूनही निडरपणे लस घेण्यासाठी केंद्रात येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला लस साक्षरता मोहीम गतिमान करावी लागणार आहे.
कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे - जिल्हाधिकारी
लसीकरणाबाबत कुणीही गैरसमज करू घेऊ नये. आरोग्य प्रशासनाकडून लसीचे पायदे समजावून सांगितले जात आहे. मात्र, कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून नागरिकांनी आता बाहेर निघावे. रूग्णसंख्या वाढत असल्याने मास्क वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. प्रतिबंधात्मक लसीचे दोनही डोज न चुकता घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
अफवांपासून दूर राहा, लस पूर्णत: सुरक्षित - डॉ. निवृत्ती राठोड
शहरातील लसीकरण केंद्रांमध्ये गरीब, कष्टकरी नागरिक बहुसंख्येने येत नसल्याच्या निरीक्षणात तथ्य आहे. लस घेतल्यानंतर ताप आल्यास मजुरी बुडेल अशीही धास्ती असावी. काही गैरसमज व अपवाही असू शकतात. नागरिकांनी यापासून दूर राहावे. लस पूर्णत: सुरक्षित आहे. कोणताही धोका नाही. निकषात बसणाऱ्या अधिकाधिक नागरिकांनी लस घेतल्यास शरीरातील विषाणूविरुद्ध लढण्याची समूहशक्ती तयार होते. विषाणूचा संसर्ग होत नाही. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना संसर्ग झाला तरी लस घेतल्याने गुंतागुंत वाढत नाही. आरोग्य विभागाकडून लसीबाबत सातत्याने माहिती देणे सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांंपासून सावध राहावे, कोरोना प्रतिबंधक लसीची वैद्यकीय माहिती जाणून घेऊन न चुकता लसी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले .