बल्लारपूर : मध्य रेल्वे, विभागातर्फे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, सिंगल यूज प्लास्टिक विरोधात एक व्यापक जनजागृती मोहीम विभागातील सर्व प्रमुख रेल्वेस्थानकांवर व रेल्वे वसाहतीत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. परंतु बल्लारशाह येथील रेल्वे प्रशासन या मोहिमेकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्टेशनच्या मागील परिसरात जिकडे तिकडे प्लास्टिक पडलेले दिसत आहे.
प्लास्टिक या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रवासी, रेल्वे कर्मचारी व वसाहतीतील रहिवाशांना सिंगल यूज प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणाऱ्या हानीबाबत जागरूक करणे होय. पोस्टर, उद्घोषणा, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम बल्लारशाह रेल्वेस्थानकावर समजाविण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून हे अभियान सुरू आहे.
परंतु रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिकचा वापर कमी झाला. फलाट क्रमांक १ च्या मागे व परिसरात प्लास्टिकचा कचरा हटविण्याकडे रेल्वेप्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या अभियानाचा फज्जा उडालेला दिसतो आहे. मध्य रेल्वे विभाग पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे व स्वच्छ, हरित रेल्वेसाठी सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.