सिंदेवाहीत १० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:58+5:30
जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. यापैकी जुलैपर्यंत सात ते आठ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. अजून आठ ते दहा हजार हेक्टरवरील रोवणीची कामे शिल्लक आहे.

सिंदेवाहीत १० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : वातावरण बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत आहे. यावर्षी तालुक्यात सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.
जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. यापैकी जुलैपर्यंत सात ते आठ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. अजून आठ ते दहा हजार हेक्टरवरील रोवणीची कामे शिल्लक आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. परिणाम सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी धानाच्या रोवण्या केल्या त्यांचेही सध्या बेहाल होत आहेत. पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. दरम्यान, रोवणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आत्तापासूनच भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी नदी, नाले, बोड्या, कोरड्या पडल्या आहे. सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने सध्या केलेल्या रोवण्या वाचविण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसाच्या अनिश्चिततेमुळे तालुक्यात दुष्काळस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. येत्या चार दिवसात पाऊस कोसळला नाही तर शेतकºयांची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
मोटारपंपाच्या पाण्यावरच रोवणी
परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस पडला नाही. काही शेतकऱ्यांनी पंपाद्वारे पाणी करून रोवणी केली आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपायला येत आहे. तरी सरासरीही पाऊस पडला नाही. परिणामी या परिसरातील शेतकरी रोवणीसाठी सद्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवत्या व पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. परंतु अगदी प्रारंभापासुनच पावसाने आपला लहरीपणा दाखविणे सुरू केले आहे. संपत चाललेल्या पावसाच्या या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस पडलेला नाही.