तीन दिवसांत ६० वर आॅनलाईन अर्ज
By Admin | Updated: September 3, 2014 23:16 IST2014-09-03T23:16:20+5:302014-09-03T23:16:20+5:30
वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांना नेहमी चकरा माराव्या लागतात. यात आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे करूनही अनेकवेळा परवाना मिळतोच,

तीन दिवसांत ६० वर आॅनलाईन अर्ज
तत्काळ मिळाले परवाने: नागरिकांचा त्रास होणार कमी
चंद्रपूर : वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांना नेहमी चकरा माराव्या लागतात. यात आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे करूनही अनेकवेळा परवाना मिळतोच, असे नाही. परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देवून अनेकवेळा दलाल नागरिकांची लुट करतात. हे सर्व टाळण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ३ तर, दुसऱ्या दिवशी तब्बल ३० शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, या सर्वांना तत्काळ परवाना सुद्धा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रणालीचे स्वागत केले आहे.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. अनेकवेळा वाहन धारकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नसतो. अशावेळी वाहतूक पोलीस दंड आकारतो. यातून सुटका मिळावी तसेच वाहतुकीचे नियम प्रत्येक वाहनधारकांना कळावे यासाठी आरटीओ कार्यालयाकडून वाहन परवाना मिळविणे गरजेचे आहे. मात्र हा परवाना मिळविताना अनेकवेळा वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. आता उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. या प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवशी तीन तर, दुसऱ्या दिवशी ३० च्या वर उमेदवारांनी अर्ज सादर केले. विशेष म्हणजे ज्यावेळी अर्ज सादर केला जातो त्याचवेळी उमेदवारांना चाचणी आणि कागदपत्र तपासणीसाठी येण्याची वेळ एसएमएसद्वारे कळविली जाते. त्यानुसार दोन दिवसामध्ये उमेदवारांना एसएमएसद्वारे माहिती मिळाली. सोबतच संगणकीय माध्यमातून वाहतूक चिन्हांची चाचणीसुद्धा घेण्यात आली. ही चाचणी एकावेळी ३० उमेदवारांना देता येते. ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्यांना शिकाऊ परवान्याचे वितरणही करण्यात आले आहे.
नियमानुसार परवाना काढणे कठिण नसले तरी, बहुतांश कार्यालयात दलाल सक्रीय असतात. त्यामुळे परवाना काढताना अनेकवेळा आर्थिक लुट केली जाते. असा आरोप नागरिक नेहमी करतात. अनेकवेळा वाहनधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये खटकेही उडतात. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, विनाविलंब आणि नियमानुसार त्यांना परवाना मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)