विधवांना मिळणार आता आॅटोरिक्षा परवाना
By Admin | Updated: March 6, 2016 00:35 IST2016-03-06T00:35:31+5:302016-03-06T00:35:31+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या परिवारास चरितार्थ चालविणे कठीण जाते.

विधवांना मिळणार आता आॅटोरिक्षा परवाना
चंद्रपूर : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या परिवारास चरितार्थ चालविणे कठीण जाते. अशा परिवारास चरितार्थाचे कायमस्वरुपी साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून अशा शेतकऱ्यांच्या विधवांना आॅटोरिक्षा परवाना वितरित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आॅटोरिक्षा खरेदी करण्यासाठी अशा विधवा महिलांना बँका व वित्तीय संस्थांकडून १०० टक्के कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट, कर्जबाजारीपणा व कर्जफेडीचा तगादा या कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्याप्रकरणी त्या कुटुंबाला शासनाकडून तातडीची मदत म्हणून एक लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर शासनाने जुलै २०१५ पासून विशेष मदतीचा कार्यक्रम विविध विभागांमार्फत राबविण्यास सुरुवात केली आहे. तरीही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अशा परिवारास चरितार्थ चालविणे कठीण जात असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे अशा कुटुंबांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना शासनाने लागू केली आहे.
सद्यस्थितीत राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद या शहरांमध्ये नवीन आॅटोरिक्षा परवाने जारी करण्यावर निर्बंध घातलेले आहेत. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींच्या बाबतीत सदर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाने तातडीची मदत पुरविण्यासाठी पात्र कुटुंब घोषित केले आहे. अशाच महिला या योजनेंतर्गत आॅटोरिक्षा परवाना मिळण्यास पात्र ठरणार आहेत. (शहर प्रतिनिधी)