पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:24+5:30
राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने शेती केली.

पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : परतीच्या व अवेळी आलेल्या पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, धान पिकाला मोठा फटका बसला आहे. नोव्हेंबर महिना म्हणजे पीक हाती येण्याची वेळ. मात्र हाती येणारे पीक पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हिरावल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाच्या वतीने सर्व्हेक्षण सुरु करण्यात येणार आहे. मात्र यापूर्वीचा अनुभव बघता प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने शेती केली. पुन्हा नवे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकरी दिवसरात्र शेतात राबू लागले. यावर्षी तरी चांगले उत्पादन होऊन घरी सुबत्ता येईल, असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच परतीच्या पावसाने एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. कापूस पिकाला चांगली बोंडे आली होती. तर सोयाबीन पीक काही शेतकऱ्यांनी कापून शेतात कडपा करून ठेवला होता. सारे काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पावसाच्या तडाख्यात सापडले. इकडे दिवाळी साजरी करण्याची लगबग असतानाच पावसाने डाव साधला. आणि कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पीक पावसाच्या कचाट्यात सापडले. सोयाबीन पीक तर शेतकऱ्यांनी कापून ठेवले होते. परंतु आलेल्या पावसाने सोयाबीन पिकाची पार वाट लावून टाकली.
कापूस व धान पीक पावसाने पूर्णत: आडवे पाडले. परतीच्या पावसाने डोळ्यादेखत पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. सोयाबीन पिकाला मोठया प्रमाणात फटका बसल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. कापूस व धान पीक पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
वर्षभराचे बजेट कोलमडले
खरिपातील पिकांवर शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. परंतु यावर्षी पावसाने शेतकºयांची इतकी बिकट अवस्था करून टाकली आहे की पुन्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कर्जाचा डोंगर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: काकुळतीला आला आहे. खरिपातील पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेटच कोलमडला आहे.
रबी हंगाम कसा करावा?
ऐनवेळी परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने हाती येणाऱ्या पिकांची पुरती वाट लागली आहे. दिवसरात्र शेतात राबूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरले नाही. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याने आता रब्बी हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीनचे ढिगारेच पाण्याखाली आले. कपाशी, धान, ज्वारी पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.