भूमी अभिलेखचे आधुनिकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:00 IST2017-12-05T00:00:01+5:302017-12-05T00:00:17+5:30
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना मिळकत पत्रिका,.,...

भूमी अभिलेखचे आधुनिकीकरण
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना मिळकत पत्रिका, टिपण, क्षेत्रबुक, शेतपुस्तक, आकारबंद, आकारफोड, गट नकाशा, मोजणी नकाशा, कमी जास्त पत्रक, चौकशी नोंदवही, सनद, अपील प्रकरणाच्या नकल, मोजणी प्रकरणाची नकल यासारख्या विविध सेवा पुरविण्यात येतात. या सेवा सहज, सोप्या पद्धतीने सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिलेखचे संधारण व आधुनिकीकरण करण्याचे काम भूमी अभिलेख विभागातर्फे सुरू आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत २ आॅक्टोबर २०१७ ते १० एप्रिल २०१८ या कालावधीत नागपूर विभागामध्ये आदर्श अभिलेख कक्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील ७३ कार्यालयांनी सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेकरिता भूमिअभिलेख विभागातील आदर्श अभिलेख कक्षाच्या रचना व कार्यपद्धतीमधील कार्यालयीन व्यवस्थापनाचे मूलभूत घटक यांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये अभिलेख कक्षाची रचना, अभिलेखाची मांडणी, अभिलेख कक्षाचे संरक्षण, अभिलेख नकाशात काढणे, स्कॅनिंग व कम्प्युटरॉयझेशन, कार्यालयीन परिसर स्वच्छता यासह इतरही निकषांचा समावेश करण्यात आलेला आहे. भूमी अभिलेख विभागातील नामांतरण, खरेदी-विक्री, वारसान हक्काने होणारे फेरफार यासंबंधीचे अभिलेख संगणकीकृत व अद्यावत करून नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नागपूर येथील भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक अभय जोशी, नागपूरचे जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, गडचिरोलीचे जिल्हा अधीक्षक गजानन डाबेराव, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर अभियान सुरू असून आधुनिकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
यापूर्वी कागदी माहिती पत्रामुळे अनेकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. मात्र या त्रासापासून आता मुक्ती मिळणार आहे.