वसतिगृहांना पुरविलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे
By Admin | Updated: August 17, 2015 00:38 IST2015-08-17T00:38:57+5:302015-08-17T00:38:57+5:30
गेल्या वर्षभऱ्यापासून अनुदान रखडल्याने मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत.

वसतिगृहांना पुरविलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे
परिपोषणासाठी निधीच नाही: कंत्राटदाराचे हित साधण्याचा प्रयत्न
चंद्रपूर : गेल्या वर्षभऱ्यापासून अनुदान रखडल्याने मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. शासनाकडून सोयी-सुविधांच्या नावाखाली या वसतिगृहांना अनेक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. मात्र त्या अतिशय निकृष्ठ दर्जाच्या असून वापरण्यायोग्य नसल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या परिपोषणासाठी हात राखून निधी दिला जात असताना दुसरीकडे निव्वळ कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी वसतिगृहांना साहित्य पुरवठा केला जात असल्याचेही संस्था चालकांचे म्हणणे आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्यावतीने या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थांच्या मार्फत वसतीगृहे चालविली जातात. चंद्रपूर जिल्ह्यात अशी ६८ वसतीगृहे आहेत. त्यात ग्रामीण भागातील तीन हजारावर विद्यार्थी राहून शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहांना शासनाकडून एकीकडे अतिशय तोकडे अनुदान दिले जात असताना दुसरीकडे हे अनुदान नियमित दिले जात नसल्याने संस्थाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना दरवर्षी साडेतीन ते चार कोटी रुपये निधीची आवश्यकता असते. पण शासनाने सन २०१३-१४ या वर्षासाठी केवळ दोन कोटी २८ लाख रुपयांचा निधी दिला, तर २०१४-१५ या वर्षासाठी दोन कोटी ४३ लाख रुपयांचे अनुदान दिले. वसतिगृह अनुदान व कर्मचाऱ्यांचे मानधन यासाठी चार कोटी रुपये खर्च आहे. त्यामुळे संस्था चालकांना वसतिगृह चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
वारंवार विनंत्या करून, संबधित मंत्र्यांना भेटूनही अनुदानाचा निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संस्था चालकांनी केला आहे. या निकृष्ठ साहित्य पुरवठ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)