केवळ आई-वडिलांच्याच उपस्थितीत पार पडताहेत विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:47+5:30
मार्च ते मे दरम्यान बहुतांश विवाह होतात. मार्च महिना सुरु होताच कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यामुळे २१ मार्चंपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. तसेच विषाणूजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. पाच लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली. या निर्णयाचा व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्यांना फटका तर बसलाच शिवाय ज्यांची लग्न मार्च महिन्याच्या शेवटी, एप्रिल महिन्यात होती त्यांनाही बसला.

केवळ आई-वडिलांच्याच उपस्थितीत पार पडताहेत विवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लग्न सोहळ्यांसह धार्मिक कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सूचना शासन तसेच प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहे. मात्र काही कुटुंबीयांनी लग्नाची तारीख निश्चित केल्यामुळे ठरलेल्या तारखेत केवळ आई-वडील तसेच दोन-चार नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडत आहे. यामध्ये कुठेही गाजावाजा न करता लग्न कार्य उरकण्यात येत आहे.
मार्च ते मे दरम्यान बहुतांश विवाह होतात. मार्च महिना सुरु होताच कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यामुळे २१ मार्चंपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. तसेच विषाणूजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. पाच लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली. या निर्णयाचा व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्यांना फटका तर बसलाच शिवाय ज्यांची लग्न मार्च महिन्याच्या शेवटी, एप्रिल महिन्यात होती त्यांनाही बसला. काही महिन्यांपूर्वीच दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने तारीख निश्चित झाली. काहींनी तर पत्रिकासुद्धा वितरीत केल्या. दोन्ही नवदाम्पत्य भ्रमणध्वनीद्वारे लग्न प्रसंगाची स्वप्ने रंगवू लागली. पण कोरोनासारखा विषाणूने सर्व नियोजन व स्वप्नावर पाणी फेरले. अशा परिस्थितीमध्ये तारीख निश्चित झालेल्यांपैकी काहींनी तारीख पुढे ढकलली तर काहींनी संचारबंदी, जमावबंदी अजून किती दिवस राहील, याबाबत अनिश्चितता असल्याने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न उरकुन घेत असल्याचे चित्र आहे. कुठलाच गाजावाजा न करता गुपचूप घरातल्या घरात लग्न लावल्या जात आहे. काही ठिकाणी तर मुलगा किंवा मुलीचा मामा किंवा अन्य अगदी जवळचे नातेवाईक प्रवेशबंदीमुळे लग्न सोहळ्यांना उपस्थित राहू शकत नसल्याचे चित्र आहे.