काँग्रेसचे मनपासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:06 IST2018-08-24T22:05:15+5:302018-08-24T22:06:00+5:30
ट्री गार्ड खरेदीचा ठराव मंजूर न करता खरेदी करून त्यानंतर हा विषय सभेत ठेवल्याने काँग्रेसच्या वतीने गुरूवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आली. शहरातील नागरिकांच्या हिताचा विचार न करता नियम धाब्यावर बसवून सत्ताधाऱ्यांकडून कामकाज केले जात आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे मनपासमोर निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ट्री गार्ड खरेदीचा ठराव मंजूर न करता खरेदी करून त्यानंतर हा विषय सभेत ठेवल्याने काँग्रेसच्या वतीने गुरूवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आली. शहरातील नागरिकांच्या हिताचा विचार न करता नियम धाब्यावर बसवून सत्ताधाऱ्यांकडून कामकाज केले जात आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. शहरातील घनकचरा कंपोस्ट डेपोवर वाजवीपेक्षा अधिक रक्कम खर्च होत आहे. ४ कोटी ५० लाख रूपये खर्च करण्यामागे कारण काय, असा प्रश्न सभेत काँग्रेस नगरसेवकांनी विचारला. ३१ जुलैला पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला नाही. शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी रूपये खर्च झाले. पण पहिल्या पावसातच दयनियवस्था झाली. त्यामुळे या रस्त्यांचे आॅडिट करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली. दरम्यान महानगरपालिका सभागृहासमोर फलक घेऊन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्र्रेस कमिटीच्या वतीने नेतृत्वात महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे यांच्याविरूध्द नारेबाजी केली. यावेळी नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, नगरसेवक अजमद अली, संगिता भोयर, शिवा राव, हरीदास लांडे, शलिनी भगत, वंदना भागवत, ईशा गोवर्धन, रीतू गणवे, करिश्मा बरडे, वंदना बेले आदी उपस्थित होते.
विकासाकडे दुर्लक्ष
शहर विकासासाठी दीर्घकालिन नियोजन न करता चुकीच्या पद्धतीने ठराव पारित केले जात आहेत. आधी निधी खर्च करायचा व त्यानंतर सभेत ठराव मांडून मंजुरी मिळवायची, हा प्रकार मनमानी कारभाराचा पुरावा आहे, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. शहराकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्थायी समितीच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा केला आहे.
स्थायी समितीच्या सभेत गदारोळ
मनपा स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विषयांवर प्रचंड गदारोळ उठला. बहुमताच्या आधाराने शहरातील विकासकामांना चालना देण्याऐवजी चुकीची कामे सुरू असल्याचा आरोप काँग्रेससह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीही केला. वृक्ष लागवड मोहिमेसाठी ट्री गार्ड खरेदी करणे योग्यच आहे. पण ही संपूर्ण प्रक्रिया नियमांच्या चौकटीतून झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली.