दादासाहेबांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची हानी

By Admin | Updated: July 26, 2015 01:28 IST2015-07-26T01:28:55+5:302015-07-26T01:28:55+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक तथा केरळचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांची शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली.

The loss of progressive movement by the departure of Dadasaheb | दादासाहेबांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची हानी

दादासाहेबांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची हानी

चंद्रपूर: रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक तथा केरळचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांची शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून दुखवटा व्यक्त होत असताना, चंद्रपूर जिल्ह्यातूनही त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सामान्य कार्यकर्ता ते केरळचे राज्यपाल अशा दादासाहेबांच्या राजकीय प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षिदार असलेले येथील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम यांनी आठवणींचा पट उलगडला. ते म्हणाले, दादासाहेब हे दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. १९६४ मध्ये दादासाहेबांच्या नेतृत्वात भूमिहिनांचा लढा उभारण्यात आला होता. या लढ्याची यशस्वी सांगता अमरावतीमध्ये झाली. असा नेत्रदीपक सोहळा मी आयुष्यात कधीच पाहिला नाही. त्यावरून दादासाहेबांचा लोकानुनय किती मोठा होता, याची कल्पना येते. १० वर्षांपूर्वी चंद्रपुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. या माणसाने निव्वळ आश्वासने दिली नाहीत. लोकांचे प्रश्न सोडवत ते पुढे गेले. पक्षासाठी त्यांनी कष्ट उपसले. चंद्रपूर विविध कारणांनी त्यांचे अनेकवेळा येणे झाले. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून सतत सामाजिक तळमळ जाणवत असायची. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा त्यांच्या पत्नी कमलाताई यांनी प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे मला सांगितले. मात्र आज अचानक त्यांच्या निधनाची बातमीच येथे येऊन धडकली आणि धक्काच बसला, असे ते म्हणाले.
सावली माझा राजकीय बालेकिल्ला
सावली गावावर दिवंगत रा.सू. गवई यांचे नितांत प्रेम होते. सावली गाव माझा राजकीय बालेकिल्ला असल्याचे ते प्रत्येक वेळच्या भाषणातून आवर्जुन सांगत. त्या काळातील येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रल्हाद गेडाम, डॉ.वाय.टी.गेडाम, राघोबा गोंगले हे त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडातील खंदे समर्थक होते. कालांतराने परिस्थिती बदलली आणि स्थित्यंतरे आली. मात्र दिवंगत रा.सू. गवई यांना या परिसरात येण्याचा प्रसंग येत होता त्यावेळी त्यांनी सावली येथे आवर्जुन भेट दिली आहे. १९८८ मध्ये उसळलेल दंगलीच्यावेळी त्यांनी सावली येथे येऊन सर्व पक्षीय बैठक बोलविली. त्यात सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, सलोखा कायम राहावा, यासाठी सर्वांची समजूत काढली. सावली विधानसभा क्षेत्र कायम राहावे, यासाठी स्थानिक कृती समितीला सहकार्य केले. परंतु त्यांना यश आले नाही. आंबेडकरी विचारधारेचे तात्कालिन खासदार जोगेंद्रनाथ मंडल व हरिहरराव सोनुने यांच्या समवेतही त्यांनी गावाला भेट दिली. केरळ आणि बिहारचे राज्यपाल असताना दोन्हीवेळा त्यांनी सावलीला भेट दिली. केरळचे राज्यपाल असताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया सावलीच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिवंगत रा.सू. गवई यांच्या हस्ते तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: The loss of progressive movement by the departure of Dadasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.