गावतलावातून गाळाचा उपसा
By Admin | Updated: June 6, 2017 00:36 IST2017-06-06T00:36:25+5:302017-06-06T00:36:25+5:30
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावतलावातून गाळ उपसण्याचे अभियान सुरु करण्यात आले. कोरपना येथे तहसीलदारांच्या हस्ते त्यांचा प्रारंभ करण्यात आला.

गावतलावातून गाळाचा उपसा
कोरपना येथे कार्यक्रम : शेतीसाठी गाळ वापरण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावतलावातून गाळ उपसण्याचे अभियान सुरु करण्यात आले. कोरपना येथे तहसीलदारांच्या हस्ते त्यांचा प्रारंभ करण्यात आला.
कोरपना तालुक्याच्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील मालगुजारी तलाव (मामा) आहेत. मात्र अतिक्रमण व गाळ साचल्याने त्या तलावात पाण्याचा साठा तयार होत नाही. परिणामी गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि बेशरम झाडाची रोपे झाल्याने शिंगाडा किंवा मासेमारीसाठी तो उपयोगात येत नाही.
तलावाचे खोलीकरण करणे व गाळ उपसा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून जलसंधारण विभागाला तलाव हस्तांतर करावा, अशी मागणी नगरसेवक सुहेल आबिद अली यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
आ. अॅड. संजय धोटे यांनी सतत पाठपुरावा करुन शासनाचे लक्ष वेधले. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग यांनी खोलीकरण कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
या गावतलावातील बेशरम झाडांचे निर्मूलन व ‘गावयुक्त गाळमुक्त शेत’ करण्यासाठी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत अल्ट्राटेक कंपनीकडून जेसीबीद्वारे गाळ उपसा करण्यात येत आहे. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापर करावा, असे आवाहन तहसीलदार हरीश गाडे यांनी केले.
यावेळी संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप बोन्सीकर जनसत्याग्रह संघटनेचे आबिद अली, सभापती शाम रणदिवे, नारायण हिवरकर, नगरसेवक अशोक डोहे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.