सोयाबीनचे उत्पादन क्विंटलऐवजी किलोत
By Admin | Updated: November 10, 2014 22:41 IST2014-11-10T22:41:35+5:302014-11-10T22:41:35+5:30
टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे

सोयाबीनचे उत्पादन क्विंटलऐवजी किलोत
टेमुर्डा : टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही अनेक शेतकऱ्यांच्या हाती आलेच नाही. ज्यांच्या हाती आले ते क्विंटलऐवजी किलोत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पीक काढणीचा खर्च तरी वाचावा म्हणून उभे पिकच वखरुन टाकले आहे.
वरोरा तालुक्यातील २१ हजारावर हेक्टरमध्ये सोयाबिनचे पीक होते. त्यात ६० टक्के शेतांमध्ये सोयाबीनचे उत्पादन झाले, तर ४० टक्के शेतातील सोयाबीन अज्ञात रोगामुळे पूर्णपणे नष्ट झाले. यावर कळस म्हणजे अत्यल्प प्रमाणात उत्पादन झालेले सोयाबीन कुठे विकायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. एकीकडे खरीप हंगाम हातचा गेला, तर दुसरीकडे रब्बी हंगामाचे नियोजन आर्थिक अडचणींमुळे कोलमडले आहे. चारही बाजुंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातूनच पिजदुरा येथील संतोष नारायण नक्षिणे (५२) या शेतकऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. सोयाबीनकडे रोखीचे पीक म्हणून पाहिल्या जाते. आता शेतकऱ्यांचे भवितव्य कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या हमी भावातही शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने यंदा कापसाचा हमी भाव जाहीर करताना क्विंटलमागे केवळ ५० रुपयांची वाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खते, तणनाशके, किटकनाशके, मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १२ हजार रुपये आहे. बागायती कपाशीला एकरी ३५ हजार तर कोरडवाहू १८ ते २० हजारापर्यंत उत्पादन खर्च येतो. मात्र हाती येणारे उत्पन्न व त्याला मिळणारा बाजारभाव यामुळे हा खर्च निघण्याचीही आशा आता मावळली आहे. (वार्ताहर)