खरीप हंगामाला निसर्गाचे ग्रहण

By Admin | Updated: September 7, 2015 01:09 IST2015-09-07T01:09:45+5:302015-09-07T01:09:45+5:30

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून पाऊस पार गायबच झाला आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यात उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागली आहे.

Kharif season reception of nature | खरीप हंगामाला निसर्गाचे ग्रहण

खरीप हंगामाला निसर्गाचे ग्रहण

पाऊस पुन्हा गायब : भरात आलेली पिके धोक्यात
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून पाऊस पार गायबच झाला आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यात उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागली आहे. यामुळे शेतशिवारातील नदी-नाले आटू लागले असून तलावांमध्येही पाण्याची टंचाई आहे. दुसरीकडे धानाच्या रोवण्या झाल्या आहेत. कपाशी व सोयाबीन फळाला आले आहेत. ऐन भरात आलेली ही पिके पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. एकूण यावर्षीच्या खरीप हंगामालाही निसर्गाने ग्रहण लावल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी पावसाबाबत प्रारंभापासूनच चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जुन, जुलै या महिन्यातच पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. अस्सल पावसाचा जुलै महिना सुरू असतानाच जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत एकूण ७७३८.७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी ५१६.९१६ मिमी पाऊस पडला. सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी निम्मीही नाही. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही.
जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होताच तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसला. त्यावेळी हवामान खात्यानेही यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही आनंदात होते. या आनंदातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेऊन पेरण्या थांबविल्या. पावसाने आपला लहरीपणा दाखविलाच. जून महिन्यापासून पाऊस जी दडी मारली ती जुलै महिना संपेपर्यंत कायम होती. यात दोनचार दिवसांचा अपवाद होता. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजुक झाली. नदी-नाले आटायला लागले. पेरण्या डोळ्यादेखत सुकू लागल्या होत्या. उलट या कालावधीत जिल्ह्यात कडाक्याचे ऊन्ह तापू लागले. परिणामी शेतकरी वर्ग कमालीचा भयभित झाला होता. दरम्यान, ४ आॅगस्ट आणि ५ आॅगस्टला जिल्ह्यातील सावली वगळता संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. संततधार नसला तरी पावसाची रिपरिप दोन्ही दिवस सुरूच होती. या पावसामुळे बळीराजा तुर्तास सुखावला.
त्यानंतर पुढे आॅगस्ट महिन्यात आणखी काही दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा तालुक्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी धानाच्या रोवण्या आटोपल्या. कोरपना, जिवती, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावती या तालुक्यातील शेतकऱ्यांनीही पिके रोगांपासून दूर रहावी म्हणून कपाशी व सोयाबीनला खतपाणी घालून ठेवले. सप्टेंबर महिन्यात पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. सध्या धानाची रोवणी झाली आहे. आता या धानाला रोजच तुरळक पावसाची गरज असते. कपाशी व सोयाबीनचे पिक फळाला आले आहेत. शेतकऱ्यांनी खते टाकली असल्याने ते मातीत मिसळायला पाणी हवे. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. आता तर उन्हाळ्यासारखी ऊन्ह तापू लागल्याने नागरिकही त्रस्त होऊ लागले आहे. पिके तर चक्क करपण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याने पाऊस परतीच्या वाटेवर असल्याचे सांगताच शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. एवढा मोठा खर्च करून लागवड केलेली पिके डोळ्यादेखत सुकणार काय, अशी चिंता त्यांना आहे. (शहर प्रतिनिधी)
सिंचन प्रकल्पातही अत्यल्प जलसाठा
यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातही जलसाठा पाहिजे तसा होऊ शकला नाही. आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत १९.०३ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ५३.४९ टक्के, नलेश्वर प्रकल्पात ५६.५९ टक्के, अमलनाला धरणात ५७.१० टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प एरव्ही पावसाळ्यात तुडुंब असतात. याशिवाय यावर्षी तलाव, नदी, बोड्यांमध्ये पाहिजे तसे पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस
यावर्षी पावसाळ्याला प्रारंभ झाला तेव्हा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ११३५.४०६ मिमी पाऊस बरसतो, अशी प्रशासकीय माहिती आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत म्हणजे १ जून ते ६ सप्टेंबरपर्यंत सरासरी ७८७.७८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता तर पाऊस परतीच्या वाटेवर आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही नागरिकांचे हाल होणार आहे, हे निश्चित.

Web Title: Kharif season reception of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.