खरीप तोंडावर; मात्र कापूस शेतकऱ्यांच्या घरीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:30+5:30
राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे.

खरीप तोंडावर; मात्र कापूस शेतकऱ्यांच्या घरीच !
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : जून महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच लॉकडाऊन असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडे बियाणे घेण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे. सीसीआयला नोंदणी केलेल्या सात हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ताटकळत बसण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे सीसीआयचा झोल कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी बहुतांश शेतमाल घरीच भरून ठेवला आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साडेसात हजारापेक्षा जास्त शेतकºयांनी नोंदणी केली. मात्र दरदिवशी फक्त मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआयला विक्रीसाठी परवानगी दिल्याने व राजुरा येथील केवळ एकाच कापूस जिनिंगवर मोजकीच कापूस खरेदी केल्याने आजही कापूस विक्रीसाठी शेतकरी प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राजुरा येथे सीसीआयने सुरू केलेली कापूस खरेदी नाममात्र असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांसमोर पैशांची अडचण
राजुरा येथील जिनींंगवर सीसीआयने शासकीय कापूस खरेदी सुरू केली खरी, मात्र सीसीआयच्या अनागोंदी कारभारामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जून महिना सुरू झाला तरी कापूस खरेदी झालेली नाही. शासनाला शेतकऱ्यांचा कापूस घ्यायचा आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीक विकलेच नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. हाती पैसा होता तो लॉकडाऊनच्या काळात खर्च झाला. आता शेतकऱ्यांसमोर पैशाची मोठी अडचण आहे.
खरीप हंगाम करायचा कसा?
शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही घरीच असल्याने शेतकऱ्यांना पैशाची अडचण जाणवू लागली आहे. राजुरा येथे एकाच जिनींगवर सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस खरीच आहे. आता पुढचा खरीप हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच जून महिन्यापर्यंत शेतमाल घरीच ठेवण्याची वेळ यंदा आली आहे, अशी खंत गोवरी येथील शेतकरी प्रभाकर जुनघरी यांनी व्यक्त केली.